ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिवसेनेने राज्यसभेसाठी सहावा उमेदवार दिल्यानंतर छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी निवडणुकीतून माघार घेतली. यावर विरोधकांनी शिवसेनेने छत्रपती घराण्याचा अपमान केला, असा आरोप सातत्याने शिवसेनेवर होत होता. मात्र शनिवारी छत्रपती संभाजीराजेंचे वडील श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी स्वतःच हा आरोप खोडून काढत, देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. संभाजीराजेंनी अपक्ष लढावं ही देवेंद्र फडणवीसांची खेळी होती असा गैप्यस्फोट केला. त्यानंतर मात्र अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. संजय राऊतांनी सुद्धा काल कोल्हापुरात बोलताना श्रीमंत शाहू महाराज छत्रपती फडणवीसांचा बुरखा फाडल्याचे म्हणत हल्लाबोल केला होता. यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मला एकाच गोष्टीचं दु:ख आहे की, काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून आदरणीय महाराजांना चुकीची माहिती दिलेली दिसते. त्या लोकांना हे समजत नाही, ज्यांनी अशा प्रकारची माहिती दिली, असा फडणवीसांनी हल्लाबोल (Devendra Fadnavis) केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मला एकाच गोष्टीचं दु:ख आहे की, काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून आदरणीय महाराजांना चुकीची माहिती दिलेली दिसते. त्या लोकांना हे समजत नाही, ज्यांनी अशा प्रकारची माहिती दिली. हे लोक एकीककडे महाराजांना अशी माहिती देऊन संभाजीराजेंना खोटं ठरवत आहेत. दुसरीकडे महाराज आणि युवराजांमध्ये काही तरी अंतर आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. असं काम जे करत आहेत. त्यांच्या या वागण्याबद्दल मला प्रचंड दु:ख आहे, असं फडणवीस म्हणाले.
मला एक गोष्ट यामध्ये निश्चितपणाने वाटते की, छत्रपती संभाजी राजे यांचं नेतृत्व गेल्या सहा वर्षामध्ये चांगल्या प्रकारे तयार होत होतं आणि होत आहे. मराठा समाजात बहुजन समाजामध्ये त्यांच्याबद्दल एक आपुलकी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकारचं नेतृत्व तयार झाल्यानंतर त्याचं कुठलंही नुकसान भारतीय जनता पक्षाला नाहीये. त्याचं नुकसान हे कोणाला आहे, हे मी सांगायची अजिबात गरज नाहीये. त्यामुळे हे नेतृत्व तयार होऊ नये किंवा ते थांबावं अशा प्रकारचा प्रयत्न कोण करणार?, हे साधं राजकारण ज्याला समजतं. त्याला देखील हे समजतं, असं फडणवीस म्हणाले.