ऑनलाईन टीम/तरुण भारत
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळं राज्यातील जनतेला गणेशोत्सव साजरा केलेला नव्हता. यावर्षी राज्य सरकारने सर्व सण निर्बंधमुक्त केल्याने गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dy CM Devendra Fadnavis)यांच्या शासकीय सागर या निवासस्थानी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावेळी फडणवीसांनी आमचा देश आणि राज्य प्रगतीपथावर जावो हीच श्रींच्या चरणी प्रार्थना अशी मागणी फडणवीसांनी केली आहे. तसेच महाराष्ट्रातील आणि देशासमोर येणारे सर्व विघ्न विघ्नहर्त्याने दूर करावेत, असं साकडं देवेंद्र फडणवीस यांनी बाप्पाला घातलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय सागर या निवासस्थानी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व विघ्न विघ्नहर्त्याने दूर करावेत. सर्वांना सुख समाधानाचं आणि आरोग्य ऐश्वर्य मिळावं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आमचा देश आणि राज्य प्रगती पथावर जावा ही श्रींच्या चरणी प्रार्थना आहे. कोरोनाच्या दोन वर्षानंतर महाराष्ट्र आणि मुंबई पूर्णत: सजली आहे. उत्साहाचं वातावरण मला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आपले उत्सव, सण आणि पर्व आपण साजरे करू लागले आहोत. मला वाटतं ही देखील ईश्वराची कृपा आहे.
हे ही वाचा : महाराष्ट्रच्या विकासाचा संकल्प पूर्णत्वास जाऊ दे ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं गणरायाला साकडं
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना झाली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय सुद्धा उपस्थित होते. गणरायाची प्रतिष्ठापना केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कोरोना संकटामुळं मंदावलेली विकासाची गती आपल्याला पुन्हा गाठायची आहे. त्यासाठी कितीही आव्हानं येऊ देत, त्यांची तमा करायची नाही, अशी हिंमत बाळगुया. लाडक्या गणरायाचं स्वागत करताना, महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च: श्रीगणेशा करण्याचा संकल्प पूर्णत्वास जावा यासाठी गणरायाला साकडं घालतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे