Devendra Fadanvis : जनता दल (धर्मनिरपेक्ष) ची काही मते कॉंग्रेसकडे वळल्यामुळे कर्नाटकात काँग्रेसचा विजय झाला असून या निकालाचा महाराष्ट्रात किंवा राष्ट्रिय राजकारणावर कोणताच परिणाम होणार नाही, असे मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. भाजपशासित कर्नाटकात काँग्रेसने बहुमताकडे मुसंडी मारल्यावर पत्रकारांनी त्यांना याविषयी विचारले असता त्यांनी आपले मत मांडले.
हेही वाचा >>> काँग्रेसला एकहाती स्पष्ट बहुमत, सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग
यावेळी बोलताना ते म्हणाले, “कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा राष्ट्रीय किंवा महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही. नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रात पुन्हा सत्तेवर येईल तसेच महाराष्ट्रात भाजप- शिवसेनेचीच सत्ता राहील” असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी “जनता दल (धर्मनिरपेक्ष) ने 2018 च्या तुलनेत 5 टक्के मतांची टक्केवारी गमावली. ही मते काँग्रेसकडे वळाली आहेत. म्हणूनच कर्नाटकात कॉंग्रेसला यावेळी विजय मिळवता आला. भाजपच्या मतांमध्ये कोणतीही घट झालेली नाही. काही पक्षांना असे वाटते की त्यांनी देश जिंकला आहे पण विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये फरक आहे” असे म्हटले आहे.
तसेच “जे उत्तर प्रदेश राज्य जिंकतात ते केंद्रिय निवडणुका जिंकतात आणि शनिवारी उत्तर प्रदेश नगरपालिका निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे”, असेही ते म्हणाले.
जनतेने नरेंद्र मोदींना नाकारले या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यावर पवारांच्याच पक्षाला कर्नाटकात एक टक्काही मते मिळाली नसल्याचा टोला उपमुख्यमंत्र्यांनी लगावला.