प्रतिनिधी/ बेळगाव
शहर परिसरात महिलांकडून वटपौर्णिमेचे व्रत मोठ्या श्रद्धेने आचरण्यात आले. वडाच्या झाडाखाली बसून व प्रत्यक्ष यमदुताशी प्रत्युत्तर देत सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचविले. तेव्हापासून वटवृक्षाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. याच श्रद्धेपोटी महिलांनी वटवृक्षाची मनोभावे पूजा केली व धागा गुंडाळला. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच वटवृक्षांनजीक महिलांची गर्दी झाली होती.
वास्तविक प्रत्येक वटपौर्णिमेला पावसाची हजेरी ठरलेली. परंतु यंदा पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे दुपारच्या उन्हात जाण्यापेक्षा सकाळी आणि दुपारी 4 नंतर महिलांनी वटवृक्षाची पूजा केली. प्रामुख्याने समादेवी गल्ली, रिसालदार गल्ली, शहरात समादेवी गल्ली, कित्तूर चन्नम्मा सर्कल येथील गणपती मंदिर आवार, सोन्यामाऊती मंदिर परिसर, कपिलेश्वर, व्हॅक्सिन डेपो, मंगाई मंदिर, विष्णू गल्ली कॉर्नर-वडगाव, कचेरी गल्ली-शहापूर या परिसरासह जेथे वटवृक्ष आहेत तेथे जावून महिलांनी मनोभावे पूजा केली.
वटपौर्णिमेला महिला परपस्परांची ओटी भरतात. यासाठी आंबा, जांभूळ, धामणं, फणसाचे गरे ही फळे आवश्यक असतात. त्यामुळे बाजारपेठेत या फळांची आवक वाढली तशीच दरांमध्येही वाढ झाली होती. वटवृक्ष जेथे आहेत तेथे बहुसंख्य विक्रेत्या महिलांनी फळे तसेच हार, फुले, श्रीफळ यांची विक्री केली.