Dhananjay Mahadik On Satej Patil : कोल्हापुरात सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे बुधवारी कोल्हापुरात बंदची हाक देण्यात आली होती. हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागले. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. शाहूंच्या भूमित सलोखा बिघडण्याचे काम काही अपप्रवृत्तीचे लोक करत असल्य़ाचे काहींचे म्हणणे आहे. तर या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर दंगलीची शृंखला सुरू झाल्याची टीका केली होती. याला प्रतिउत्तर देताना भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी हे भाजपाला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याची टीका केली.आज त्यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माजी गृहमंत्री सतेज पाटील यांच्यावरही निशाणा साधला.
काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना सतेज पाटील यांनी राज्यातील धार्मिक वादाच्या घटना पाहता कोल्हापुरात जातीय तेढ निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे वक्तव्य केले होते. या प्रश्नाला उत्तर देताना खासदार महाडिक यांनी त्यांना इतकं समजतं तर ते ज्योतिषी आहेत का असा सवाल केला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की,जाणीवपूर्वक भाजपला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात मविआचे सरकार गेल्यानंतर मविआचे नेते सत्येविना पाण्यातून बाहेर आलेल्या माशाप्रमाणे तडफडत आहेत. नेत्यांचा तोल सुटत असून त्यामुळेच वैफल्यग्रस्त वक्तव्य त्यांच्याकडून होत असल्याची टीका केलीयं.
संपूर्ण राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत याबद्दल कुणाचं दुमत नाही मात्र काही दिवसांपासून राज्यात औरंगजेब आणि टिपू सुलतान यांना दैवत मानणारी जमात कार्यरत आहे,अशा प्रवृत्तीकडूनच समाजात विष पेरलं जात असून असे समाजविघातक कृत करणाऱ्यांना महाराष्ट्रासह देशात थारा नाही असेही महाडिक म्हणाले.