पंढरपूरात आषाढीची महापूजा रोखण्याचा धनगर समाजाचा इशारा : पालकमंत्री बदलण्याचा राष्ट्रवादीमधील नेत्यांचा कुटील डाव
प्रतिनिधी / सोलापूर
लाकडीः लिंबोडी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून उजनी धरणातून इंदापूर व बारामती तालुक्याला पाणी देण्याचा निर्णय सोलापूर जिह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी घेतला असल्याचा आरोप त्यांच्यावर सध्या केला जात असून यामुळे पालकमंत्री पदावरुन त्यांची उचलबांगडी करावी, अशी मागणी काही संघटना व राजकीय नेत्याकडून होत आहे. मात्र सोलापुरातील धनगर समाज पालकमंत्र्यांच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. पालकमंत्रीr भरणे यांना पालकमंत्री पदावरून बदलल्यास धनगर समाज राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सोलापूरात दिला आहे. पंढरपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पालकमंत्री हटविण्याचा निर्णय घेतला तर आषाढीच्या महापूजेपासून मुख्यमंत्र्यांना रोखण्याचा इशारा धनगर समाजाने सरकारला दिला आहे.
सध्या पालकमंत्री भरणे यांनी उजनीतील पाच टीएमसी पाणी इंदापूर व बारामतीसाठी नेत असल्याच्या कारणावरुन सोलापूर शहर व जिह्यातून मोठया प्रमाणावर विरोध केला जात आहे. पाणी नेण्यास विरोध करण्यासाठी संघर्ष समिती निर्माण करण्यात येत आहे. याचा परिणाम येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत होण्याची शक्यता गृहित धरून सोलापूरातील बहुतांश राजकिय नेत्यांनी या योजनेला विरोध करत सोलापूरचा पालकमंत्री बदलण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री भरणे यांच्याजागी स्थानिक किंवा मंत्री हसन मुश्रीफ यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पालकमंत्री बदलण्याच्या विषयावरून जिह्यात वादळ उठले असताना पालकमंत्र्यांच्या बचावासाठी धनगर समाज पुढे आला आहे. पालकमंत्री धनगर समाजाचे असल्यानेच काही राजकिय लोक जाणीवपुर्वक त्यांची बदनामी करत असल्याचा आरोप समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. भरणे यांचे पालकमंत्रीपद बदलल्यास धनगर समाजाच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सोलापूरात दिला आहे.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना पदावरून हटवले तर धनगर समाज व सामाजिक संघटना राज्यभर आंदोलन करेल, असा इशारा धनगर समाजाच्या वतीने रविवार दिनांक 22 मे रोजी सोलापूर येथील पत्रकार परिषदेत देण्यात आला. या पत्रकार परिषदेस शेखर बंगाळे, विजयकुमार गाविर, बिरप्पा बंडगर, निमिषा वाघमोडे , सचिन हाळे, विकी लवटे आदी उपस्थित होते.
पंढरपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये समाजाने भूमिका मांडली. सोलापूर शहराची पाणी टंचाई दूर होण्यासाठी पालकमंत्री प्रयत्नशिल आहेत. बहुजन समाजातील नेतृत्व पुढे आल्याने त्यांना दाबण्याचा प्रयत्न जिल्हयातील आ.बबनदादा शिंदे, माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, आ.संजयमामा शिंदे हे करीत असल्याचा आरोपदेखील धनगर समाजाने केला आहे. धनगर समाजाचा महाराष्ट्रात एकच आमदार, मंत्री व पालकमंत्री म्हणून दत्तात्रय भरणे काम करीत आहेत. पालकमंत्री भरणे यांच्यावर आरोप करुन त्यांची राजकीय कारकीर्द संपविण्याचा डाव महाराष्ट्रातील धनगर हाणून पाडणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी आदित्य फत्तेपूरकर, परमेश्वर कोळेकर, संतोष बंडगर, नानासाहेब खांडेकर तसेच धनगर समाजातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.