‘तमनार’संदर्भात यू टर्न भूमिका घेतल्याबाबत ‘आप’कडून हल्लाबोल
प्रतिनिधी /पणजी
वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यासारख्या स्वार्थी राजकारण्याने केलेल्या तमनार प्रकल्पाबाबतच्या विधानावर आश्चर्य करण्यासारखे काहीच नाही, असा टोला आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष ऍड. सुरेल तिळवे यांनी शुक्रवारी लगावला.
तामनार प्रकल्प पूर्ण होणे महत्त्वाचे असून ते अयशस्वी झाल्यास, राज्य सरकारला महाराष्ट्र आणि कर्नाटकप्रमाणे वीज दरवाढ करावे लागेल, असे ढवळीकर यांनी स्पष्ट केले आहे.
ढवळीकर यांनी तामनार प्रकल्प पर्यावरणस्नेही नसल्याचे सांगत निवडणुकांपूर्वी याच प्रकल्पाला विरोध केला होता. मात्र आता मंत्रिपद मिळाल्यावर या प्रकल्पातील तांत्रिकता आणि फायद्यांबाबत आपले अज्ञान मान्य करत या प्रकल्पाला दुजोरा देत आहेत. ढवळीकर एक स्वार्थी राजकारणी असल्याचे गोमंतकीयांना ज्ञात झाले असून असे अनेक यू-टर्न घेऊन ढवळीकरांनी जनतेचा विश्वास गमावल्याचे तिळवे म्हणाले.
तिळवे म्हणाले, प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा न देण्याबाबत किंवा नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपशी युती न करण्याबाबत ढवळीकर यांची विधाने केवळ जनतेला मूर्ख बनवण्यासाठीच होते. ढवळीकर यांनी नेहमीच स्वतःचा स्वार्थ डोळय़ासमोर ठेवून निर्णय घेतला आहे. ढवळीकरांसारखे नेते सर्वसामान्यांसाठी नव्हे तर स्वतःच्या हितासाठी काम करतात. आता हे गोमंतकीयांच्या लक्षात देखील आले आहे. म्हणूनच ढवळीकर यांना आता कोणीही गांभीर्याने घेत नाही.
या प्रकल्पामुळे धारबांदोरडा येथे यापूर्वीच हजारो झाडांची कत्तल झाली आहेत. माननीय सर्वोच्च न्यायालयाने केवळ नागरिक तसेच राजकीय दबावामुळे गोव्याला विनाश होण्यापासून वाचवले आहे. कायद्याचे उल्लंघन करून या प्रकल्पासाठी आधीच झाडे तोडली आहेत. यावर ढवळीकर काय कारवाई करणार?, असा सवाल तिळवे यांनी केला.
अधिवेशनात ‘आप’चे आमदार मुद्दा उपस्थित करणार!
इतर राजकीय नेत्यांप्रमाणे, आप खोटी आश्वासने देत नाही. राज्यावर विपरित परिणाम करणाऱया तामनार प्रकल्पाला आमच्या नेत्यांनी पूर्वीपासूनच विरोध केला आहे आणि दोन्ही आमदार आगामी विधानसभेच्या अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करतील, असेही तिळवे पुढे म्हणाले,