वयाच्या 41 व्या वर्षी जगभरातील आयपीएलच्या चाहत्यांना महेंद्रसिंग धोनीने पाचव्यांदा आयपीएल चषक जिंकून भेट केला आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत 249 सामने खेळले आहेत. त्याच्याच नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने 4 वेळा (2010, 2011, 2018, 2021) आणि आता पाचव्यांदा जेतेपद पटकावलं आहे. आयपीएलच्या अंतिम फेरीत खेळण्याची धोनीच्या संघाची ही दहावी वेळ आहे. गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त असणारा धोनी या मौसमाचा खरा आकर्षण बिंदू होता. कारण या मौसमानंतर तो निवृत्ती जाहीर करेल अशी शक्यता होती. उद्घाटन समारंभासाठी सजलेले अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम असो किंवा कोरोनानंतर थालाच्या अर्थात धोनीच्या एका झलकेसाठी आतुरलेले चेन्नईचे चिदंबरम स्टेडियम असो, तिथल्या सलग दोन चेंडूवर दोन षटकार असो प्रत्येक क्षणाला धोनीच्या नावाचा गजर होत होता. संपूर्ण मौसमात चाहते प्रतिसाद देत होते. झारखंडच्या एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या महेंद्रसिंग धोनीचे क्रिकेट जगतावरील गारुड त्याच्या लोकप्रियतेची साक्ष देत होते. कसोटीच्या क्षणातही निश्चलपणे उभा राहून सामन्याचा निकाल बदलण्याची ताकद असणारा हा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असो किंवा आयपीएलमध्ये नेहमीच शांतचित्ताने संकटावर मात करत असलेला जगाने पाहिला. पाचव्यांदा आयपीएलचा चषक जिंकून त्याने रोहित शर्माच्या यशाशी बरोबरी केली. या त्याच्या यशाला साथ लाभली ती प्रेक्षकांची. त्यामुळेच या विजयानंतर भावनिक झालेल्या धोनीने आपण चाहत्यांच्या प्रेमाने भारावून गेलो, त्यांच्यासाठी आणखी एक हंगाम खेळता येईल का याचाही विचार करेन असं जाहीर केलं. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये अधिकचा उत्साह संचारणे स्वाभाविक आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे हा हंगाम त्याचा अखेरचा ठरेल असे मानले जात होते. अपेक्षित विजय मिळाल्यानंतर हीच योग्य संधी समजून थांबणे कोणत्याही खेळाडूला योग्यच वाटले असते. तसा विचार धोनीच्या मनातही आला असेल. मात्र चाहत्यांच्या प्रतिसादाने भावनिक झालेल्या धोनीने पुढचे सात-आठ महिने आपल्या हातात आहेत. आपले शरीर कशी साथ देईल आणि त्या जोरावर पुढच्या हंगामाबद्दलचा निर्णय घेता येईल असे जाहीर केले आहे. पाचव्या चषकाबरोबरच धोनीची ही घोषणाच त्याच्या चाहत्यांसाठी मोठी गिफ्ट ठरली आहे. पुढच्या हंगामातही त्याला खेळताना पाहणे खूपच उत्साहवर्धक असेल. त्यासाठी तो तंदुरुस्त राहावा आणि पुन्हा पुढच्या वर्षीही खेळावा अशी प्रार्थना ते करतच राहतील. प्रत्येक व्यक्तीची स्वत:ची एक आंतरिक शक्ती असते. ती शक्ती त्याला मोक्याच्या क्षणी कोणता निर्णय घ्यावा याची प्रेरणा देत असते. तशा प्रेरणेने उचल खाल्ल्यानंतरच असा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो. अन्यथा यशाच्या अशा शिखरावर असताना पुन्हा एक डाव खेळणे तेही क्रिकेट सारख्या अनिश्चिततेने भरलेल्या क्षेत्रात तो खेळून पाहणे तसे अवघडच. पण धोनीच्या संपूर्ण आयुष्याकडे पाहिले तर त्याने असे प्रत्येक निर्णय घेतले आणि ते स्वत:च्या कष्टाच्या जीवावर यशस्वी करून दाखवले हे लक्षात येईल. त्यादृष्टीने विचार केला तर धोनीने आपल्या या दुखापतीवर मात करावी आणि पुढच्या वर्षी स्वत:चाच एक विक्रम करून ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त करणे चुकीचे ठरणार नाही. कारण, त्याच्याबद्दल केवळ चाहत्यांच्याच नव्हे तर महान खेळाडूंच्याही भावना आगळ्यावेगळ्या आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा प्राथमिक फेरीतला शेवटचा सामना चेन्नईत होता तेव्हा हाच कदाचित शेवटचा सामना ठरला तर तो लोकांच्या स्मरणात राहावा म्हणून धोनीने टेनिस बॅटद्वारे टोलवलेले चेंडू चाहत्यांना भेट देण्यात आले. तेथून धोनी परतत असताना त्यावेळी लाईव्ह कार्यक्रमात असणारे महान खेळाडू लिटिल मास्टर सुनील गावस्कर आपले दूरचित्रवाणी वाहिनीवरील लाईव्ह प्रक्षेपण सोडून धोनीकडे वळले. त्यांनी एका कॅमेरामनकडून मार्कर मागून घेतला आणि महेंद्रसिंग धोनीला छाती पुढे करून आपल्या शर्टवर सही करण्यास सुचवले. भारतीय क्रिकेट विश्वाला विश्वचषकाच्या यशाची चव पहिल्यांदा चाखायला देणाऱ्या संघाचे मुख्य आधारस्तंभ असणाऱ्या महान खेळाडूने धोनीच्या कारकिर्दीचा एका अर्थाने आगळावेगळा सन्मान केला होता. या घटनेबद्दल बोलताना भावुक झालेल्या गावस्कर यांनी आपल्या आयुष्याचा जेव्हा शेवटचा क्षण येईल तेव्हा 1983 साली कपिल देवने उंचावलेला विश्वचषकाचा क्षण आणि धोनीने षटकार मारून जिंकलेला विश्वचषकाचा क्षण दाखवा म्हणजे मी सुखाने या जगाचा निरोप घेईन अशी भावना व्यक्त केली. अर्थात डॉन ब्रॅडमन यांच्याप्रमाणे सुनील गावस्कर यांच्या आयुष्याची खेळीसुद्धा प्रदीर्घकाळाची असावी आणि क्रिकेटचे हे जितेजागते लिजेंड आपल्या आयुष्यात असा पराक्रम गाजवणारे अनेक खेळाडू आणि अनेक क्षणांचे साक्षीदार व्हावेत हीच भारतीय क्रीडा रसिकांची भावना असेल. तशीच भावना धोनी विषयीही असेल. भारतीय क्रिकेट एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा विचारी खेळाडू. शांत पण आक्रमक आणि कोणताही धाडसी निर्णय घेण्यात मागेपुढे न पाहणारा म्हणून त्याची ख्याती. आपल्या कप्तानपदाचा दबदबा त्याने जगभर निर्माण केला. भारतीय क्रिकेट त्याच्या काळात गाजत आणि गर्जत राहिले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाला 2007 मध्ये ट्वेन्टी20 विश्वचषक तसंच 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक धोनीनेच जिंकून दिला. विश्वविजेता ठरलेल्या भारताचा तो सर्वात यशस्वी कर्णधार आहे. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तो निवृत्त झाला असला तरीही त्याने जी उंची गाठली आहे ती त्याच्यानंतर राखणे त्याच्या साथीदारांना आजही शक्य झालेले नाही. आयपीएल कितीही गोड वाटत असले तरी त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सर येत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताला आपला दबदबा कायम राखायचा असेल तर धोनी सारख्या मार्गदर्शकाची नितांत आवश्यकता भासेल. त्यासाठी त्याला मैदानावर पाहणे अधिक आनंददायी असेल.