अहमदाबाद येथे पंतप्रधान मोदी आणि अँथोनी अल्बानेस यांच्या उपस्थितीत कसोटी सामन्याला प्रारंभ
वृत्तसंस्था /अहमदाबाद
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या संघांमधील अहमदाबादमधला चौथा आणि या मालिकेतला अंतिम कसोटी सामना ‘क्रिकेटच्या माध्यमातून मुत्सद्देगिरी’चे उत्कृष्ट उदाहरण ठरेल अशी शक्यता आहे. या सामन्याचा प्रारंभ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानेस यांच्या उपस्थितीत गुरुवारी झाला. दोन्ही देशांमधील मैत्रीसंबंधांना आता 75 वर्षे पूर्ण होत आहेत आणि त्याचे निमित्त साधून ही क्रिकेट डिप्लोमसीही साध्य केली जात आहे.
पंतप्रधान मोदी आणि अल्बानेस यांनी क्रिकेट मैदानात सामना सुरु होण्यापूर्वीच एकत्र प्रवेश केला. त्यांनी मैदानाला एक फेरीही मारली. या फेरीसाठी विशेष क्रिकेट थीम असलेली बग्गी सजविण्यात आलेली होती. तसेच दोन्ही संघांच्या कप्तानांसमवेत त्यांनी फोटोसेशन केले. दोघांनी लंचपर्यंतच्या खेळातील जवळपास दीड तासांचा खेळही पाहिला आणि नंतर ते त्यांच्या अन्य कामांसाठी गेले. या सर्व खेळींमेळीच्या कार्यक्रमात एकच अपरिहार्य अडथळा होता तो म्हणजे, कठोर सुरक्षा व्यवस्थेचा. अर्थात त्याला काहीही पर्याय नव्हता. कारण दोन महत्त्वपूर्ण देशांचे पंतप्रधान येथे एकत्र असल्याने सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक असणार हे अपेक्षितच होते. या सुरक्षेमुळेच या डिप्लोमसीच्या प्रसंगी मैदानाच्या स्टँडस्मध्ये उपस्थिती फारशी नव्हती. या प्रचंड मैदानाची क्षमता साधारणतः सव्वा लाख प्रेक्षकांची आहे. मात्र, सकाळी या कार्यक्रमांच्या वेळी 20 हजारच्या आसपास विशेष प्रेक्षक उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या देशांच्या संघांतील खेळाडूंचा परिचयही करुन घेतला. एकंदर हा कार्यक्रम सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला.
उपस्थितांकडून उभे राहून स्वागत
दोन्ही देशांच्या या प्रमुख नेत्यांचा मैदानात प्रवेश झाल्यानंतर उपस्थित प्रेक्षक आणि मैदानाचा अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांनी त्यांना उभे राहून अभिवादन केले. दोन्ही नेत्यांनी मैदानाला फेरी मारली तेव्हाही उपस्थितांकडून टाळय़ांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी अल्बानेस यांना त्यांचे एक तैलचित्र भेट म्हणून दिले तर मंडळाचे सचिव जयेश शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांचे तैलचित्र भेट म्हणून दिले.. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी ‘हॉल ऑफ फेम’ या विशेष कक्षाचे उद्घाटन केले. या कक्षात क्रिकेटचा इतिहास आणि वर्तमान यांचा सुरेख मेळ दिसून येतो.
रवि शास्त्री यांचे समालोचन
या सर्व हृद्य सोहळय़ाला भारताचे माजी खेळाडू आणि माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे धीरगंभीर समालोचन लाभले होते. त्यामुळे कायर्मक्रमाचा आनंद द्विगुणित झाला होता. दोन्ही संघांचे कप्तान रोहित शर्मा आणि स्टीव्ह स्मिथ पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान अल्बानेस यांच्यासह मैदानात आले आणि त्यांनी आपापल्या संघांमधील खेळाडूंचा परिचय करुन दिला.
अल्बानेस यांनी या दौऱयातील ऑस्टेलियाचा सर्वात यशस्वी खेळाडू नॅथन लायन याच्याशी काही सेकंद गप्पा केल्या तर त्याचवेळी पंतप्रधान मोदी सर्व भारतीय खेळाडूंना भेटले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्यासह भारतीय खेळाडूंनी राष्ट्रगीतगान केले. सर्वांच्याच स्मरणात प्रदीर्घकाळ राहील असाच हा कार्यक्रम होता.