जिल्हय़ात धावताहेत 12 वाहने : विविध समस्यांचे होणार निवारण
प्रतिनिधी /बेळगाव
पिकांवरील कीड, माती परीक्षण, हवामानाचा अंदाज आणि इतर शेतीसंबंधी समस्यांमुळे थेट शेतीच्या बांधांवर जावून मार्गदर्शन करण्यासाठी कृषी संजीवनी योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत जिल्हय़ातील विविध भागात कृषी संजीवनी वाहने धावत आहेत. शिवाय शेतकऱयांच्या विविध समस्यांबाबत निवारण केले जात आहे. त्यामुळे कृषी संजीवनी योजना शेतकऱयांना आधार ठरत आहे.
जिल्हय़ात बारा कृषी संजीवनी वाहने धावत आहेत. त्यामध्ये कागवाड, बैलहोंगल, नागरमुन्नोळी, अरभावी, गोकाक, निपाणी, रायबाग, कुडची, सौंदत्ती, के. चंदरगी, संकेश्वर, हुक्केरी आदी भागात कृषी संजीवनी वाहने धावत आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी आणि इतर पीक उत्पादनाबाबत शेतकऱयांना तातडीने सूचना आणि मार्गदर्शन मिळत आहे.
जमिनीची पोषकता, रासायनिक खतांचा वापर आणि इतर गोष्टी समजून घेऊन शेतीत अधिक उत्पादनासाठी कृषी संजीवनी योजना उपयुक्त ठरणार आहे. शेतकऱयांना सुधारित बी-बियाणे, कीटकनाशके आणि गरजेनुसार रासायनिक खतांचा वापर याबाबतही थेट शिवारात जावून मार्गदर्शन केले जात आहे.
शासनाकडून जाहीर होणाऱया विविध योजना, बी-बियाणे, उपाय, खते शेतकऱयांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. एकंदरीत संपूर्ण शेतीसंबंधीची माहिती या कृषी संजीवनी वाहनाद्वारे शेतकऱयांपर्यंत पोहोचविली जाणार आहे.
कृषी संजीवनी योजनेंतर्गत जिल्हय़ात 12 वाहने धावत आहेत. या वाहनांमध्ये कृषी साहाय्यक आणि तांत्रिक अधिकारी असणार आहेत. शेतीवर जावून शेतकऱयांना हंगामानुसार शेती उत्पादनासाठी आणि इतर समस्यांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
– शिवनगौडा पाटील (उपनिर्देशक, कृषी खाते)