लाभार्थ्यांना तहसीलदार कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन, पेन्शन पूर्ववत करण्यासाठी कागदपत्र जमा करणे आवश्यक
बेळगाव : निवडणुकीच्या आचारसंहितेपासून काही पेन्शनधारकांची पेन्शन बंद झाली आहे. त्यामुळे दैनंदिन जीवन जगताना अडचणी येऊ लागल्या आहेत. दिव्यांग, विधवा, वयोवृद्ध पेन्शनधारकांनी तहसीलदार कार्यालयात येऊन कागदपत्रांची खातरजमा करावी, शिवाय पेन्शन बंद झाल्यास नवीन कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन तहसीलदार कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. शासनाकडून दिव्यांग, विधवा, वयोवृद्ध, निराधार, व्यक्तिंना मासिक पेन्शन दिली जाते. मात्र काही कारणास्तव काही लाभार्थ्यांची पेन्शन बंद झाली आहे. मागील दोन तीन महिन्यांपासून पेन्शन बँक खात्यात जमा झाली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांसमोर अडचणी वाढू लागल्या आहेत विशेषत: दिव्यांग आणि वयोवृद्ध व्यक्तींची कुचंबणा होऊ लागली आहे. कोणीही याबाबत माहिती देत नाहीत. त्यामुळे पेन्शनबाबत कोणाकडे विचारणा करावी, या विवंचनेत लाभार्थी सापडले आहेत. तर काहींनी दुर्लक्ष करून शांत राहणे पसंत केले आहे. मात्र पेन्शन बंद झालेल्या लाभार्थ्यांनी पूर्ववत पेन्शन सुरू करण्यासाठी तहसीलदार कार्यालयात येणे गरजेचे आहे. शिवाय योग्य त्या कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे.
अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे
शासनाच्या पेन्शनचा लाभ घेणाऱ्या व्यक्तिंची संख्या अधिक आहे. इंदिरा गांधी, वृद्धापवेतन, साठ वर्षांवरील ज्येष्ठांना लागू करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांना मासिक पेन्शन दिली जाते. त्याबरोबर अंध, दिव्यांग, विधवा आणि निराधारांना देखील मासिक पेन्शन दिली जाते. काही लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात पेन्शन जमा होते. तर काहींना पोस्टाद्वारे पेन्शन दिली जाते. मात्र काही लाभार्थ्यांची पेन्शन बंद झाली आहे. याबाबत बँक आणि पोस्ट खात्यात चौकशी केली असता. समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. त्यामुळे पेन्शन कशासाठी बंद झाली आहे? हे लाभार्थ्यांना कळेनासे झाले आहे. पेन्शन बंद असलेल्या लाभार्थ्यांनी तहसीलदार कार्यालयात येऊन चौकशी करावी. शिवाय कागदपत्राची पूर्तता करून पेन्शन पूर्ववत करावी.