मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर संभाजीराजेंची चर्चा : शिवसेनेची उमेदवारी घेण्यास असहमती : अपक्ष भूमिकेवर ठाम, मात्र ‘पुरस्कृत’चा पर्याय पुढे
प्रतिनिधी/ मुंबई, कोल्हापूर
राज्यसभेच्या निवडणुकीत आपल्या अपक्ष उमेदवारीला शिवसेनेसह महाविकास आघाडीने पुरस्कृत करावे, असा प्रस्ताव माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून लढण्याचा निर्धार केलेल्या संभाजीराजे यांनी गुरूवारी राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. वर्षा निवासस्थानी सुमारे 35 मिनिटे झालेल्या या चर्चेचा सविस्तर तपशिल मिळू शकला नाही. मात्र संभाजीराजे यांनी आपल्या अपक्ष उमेदवारीला शिवसेनेसह महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षांनी पाठबळ द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री ठाकरे यांना केली. तसेच शिवसेनेत प्रवेश करण्यास आपण इच्छुक नसल्याचे स्पष्ट करत आपली उमेदवारी शिवसेनेसह महाविकास आघाडीने पुरस्कृत करावी, असा प्रस्ताव संभाजीराजेंनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचे निश्चित केले आहे. त्यांनी महाविकास आघाडीसह भाजप आणि अपक्ष आमदारांनाही पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. शिवसेनेने सहाव्या जागेवर उमेदवार उभा करण्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर गुरूवारी सायंकाळी संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी संभाजीराजे यांना शिवसेनेचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्याचा प्रस्ताव दिला. पण संभाजीराजे यांनी या प्रस्तावात दुरूस्ती करण्याची विनंती केली. माझी उमेदवारी शिवसेनेच्या सहकार्याने आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करावी, असा प्रस्ताव संभाजीराजेंनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून आपल्या प्रस्तावाबाबत निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी संभाजीराजेंना सांगितल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.
केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून संभाजीराजेंबाबत निर्णय : फडणवीस
राज्यसभेच्या सहाव्या जागेबाबत भाजपने अद्याप कोणतेही भूमिका अथवा निर्णय जाहीर केलेला नाही. गुरूवारी या संदर्भात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रकारांनी विचारणा केली असता ते म्हणाले, राज्यसभेच्या संदर्भातील विषय हा पक्षाच्या केंद्रीय समितीपुढे येतो. या संदर्भात केंद्रीय नेतृत्व जो निर्णय देईल, त्यानुसार प्रदेश भाजपच्या वतीने अंमलबजाणी केली जाईल. फडणवीस यांच्या सावध पवित्र्यामुळे भाजपच्या भूमिकेविषयीचा सस्पेन्स कायम आहे.