मनपाच्या आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस : कामकाज सुधारण्याबाबत अधिकाऱ्यांना तीन महिन्यांची डेडलाईन, पालकमंत्र्यांनी ऐकले गाऱ्हाणे
बेळगाव : शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला. त्यानंतर स्मार्ट सिटी करण्यासाठी मोठा निधी खर्च करण्यात आला. मात्र या कामांमध्ये बेळगावची जनता समाधानी नसल्याचे स्पष्ट दिसून आले. मनातील खदखद बुधवारी महापालिकेमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासमोर जनतेने मांडली. स्मार्ट सिटीच्या कामांबाबत अक्षरश: तक्रारींचा पाऊस पडला. ही खदखद पाहून पालकमंत्र्यांनीही अधिकाऱ्यांना तीन महिन्यांचा वेळ दिला आहे. या तीन महिन्यांमध्ये सुधारणा झाली नाही तर कठोर कारवाई करू, असा इशारा दिला. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्र्यांनी स्मार्ट सिटी आणि महानगरपालिकेच्या कार्याचा प्रगती आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, आमदार राजू सेठ, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, जिल्हाधिकारी नितेश पाटील आदी उपस्थित होते. नगरसेवकांच्या उपस्थितीतच ही बैठक पार पडली. मात्र या बैठकीमध्ये जनतेला तक्रारी मांडण्याची मुभा देण्यात आल्यामुळे जनतेने कागदपत्रांच्या पुराव्यांसह आपले गाऱ्हाणे मांडले. दरम्यान नगरसेवकांनीच महापालिकेमधील अधिकाऱ्यांबद्दल थेट तक्रारी केल्या. अधिकारी आम्ही सांगितलेले काम करत नाहीत. मात्र एजंटांमार्फत गेले असता ते काम तातडीने पूर्ण करतात, असा थेट आरोप नगरसेवकांनी केला. यामुळे सभागृहात सारेच आवक् झाले. नगरसेवकांची ही अवस्था असेल तर सर्वसामान्य जनतेची कामे करणे किती कठीण असेल, याचा अंदाज बांधणेही कठीण आहे. महसूल विभागातील अधिकारी कशाप्रकारे भ्रष्टाचार करतात याचा पाढाच नगरसेवकांनी पालकमंत्र्यांसमोर वाचला. सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक शांत बसले होते. मात्र विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी अधिकाऱ्यांवर सडकून टीका केली.
राजर्षि शाहू महाराजांचा पुतळा उभा करा
राजर्षि शाहू महाराजांचा पुतळा उभारावा यासाठी मागील सरकार असतानाच त्याला मंजुरी देण्यात आली होती. 1 कोटी रुपयांचा निधी यासाठी उपलब्ध करण्यात आला आहे. तेव्हा अधिकाऱ्यांनी या कामाला लागावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यानंतर आता राजर्षि शाहू महाराजांचा पुतळा उभारायचा असून अधिकाऱ्यांनी कामाला चालना द्यावी, असे सांगितले.
जन्म-मृत्यू दाखल्यांसंदर्भात समस्या
महापालिकेमधून जन्म आणि मृत्यू दाखला दिला जातो. मात्र हे दाखले देताना अधिकारी काहीतरी कारण सांगून टाळाटाळ करत आहेत. नावामध्ये किंवा आधारकार्डमध्ये थोडीशी चूक राहिली तरी विविध अटी लादल्या जात आहेत. त्यामधील थोड्या अटी शिथिल करून तातडीने जन्म आणि मृत्यू दाखले उपलब्ध करावेत, अशी मागणी करण्यात आली.
बळ्ळारी नाल्यातील गाळ काढा
आनंदनगर ते बळ्ळारी नाल्यापर्यंत गटारी बांधण्यात आल्या. मात्र बळ्ळारी नाल्यातील गाळ काढला नाही तर या परिसरातील शेतीला तसेच उपनगरांनाही पुराचा फटका बसणार आहे. गाळ काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे सांगून तातडीने यासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी केली आहे.
दक्षिण मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेकडून अनेक तक्रारी
दक्षिण मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने अनेक तक्रारी केल्या. पाणीपुरवठा, रस्ते, गटारी, पथदीप याबाबत अधिक तक्रारी दाखल झाल्या. अजूनही अनेक कामे अर्धवट आहेत. त्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. होसूर येथील आरोग्य केंद्रही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा या सर्व समस्या सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.