संकेश्वरमधील नदी पात्रातील पाण्याचे घेतले नमूने : अहवाल आल्यानंतर कारवाई होण्याची शक्यता : दूषित पाण्यामुळे पिकांची खुंटली वाढ
प्रतिनिधी /संकेश्वर
हिरण्यकेशी नदीत साखर कारखान्याने मळीचे पाणी सोडून पाणी दूषित केले आहे, अशी तक्रार नांगनूर (महाराष्ट्र) येथील नागरिकांनी महाराष्ट्र व कर्नाटकातील प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी संकेश्वर येथील हिरण्यकेशी नदीला भेट देऊन पाण्याचे नमूने तपासणीसाठी घेतले आहेत.
साखर कारखान्याच्या मळीचे पाणी हिरण्यकेशी नदीपात्रात मिसळल्यामुळे नदीचे पाणी दूषित झाले आहे. यामुळे नागरिक व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच हे दूषित पाणी शेतीपिकांना दिल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. यामुळे शेतकऱयांचे नुकसान होत आहे. अनेक महिन्यांपासून मळीचे पाणी हिरण्यकेशी नदीत सोडू नका, अशी विनंती कारखान्यास करण्यात येत आहे. पण याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अखेर याबाबतची तक्रार कर्नाटक व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे देऊन या प्रकरणाकडे लक्ष वेधण्यात आले.
या तक्रारीची दखल जिल्हाधिकाऱयांनी गांभीर्याने घेतली आहे. कोल्हापूर, बेळगाव जिल्हय़ातील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तसेच नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचे शिष्टमंडळ एकत्र येऊन जिल्हाधिकारी यांच्याच नेतृत्वाखाली गोटूरनजीक हिरण्यकेशी पात्रातील पाण्याचे नमूने घेण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे हिराशुगर प्लॅन्टमधील नमूने, दोन खत प्रकल्पाचे नमूने, साखर कारखान्यातील सांडपाण्याचे नमूनेही घेतले. तसेच गडहिंग्लज येथील हरळी साखर कारखान्याला भेट देऊन हरळी बंधारा, कोल्हापूर बंधारा व जरळी बंधारा येथील पाण्याचे नमूने घेऊन पंचनामा करण्यात आला. पाण्याचे घेण्यात आलेले सर्व नमूने प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतरच मळीचे पाणी कोणत्या कारखान्याकडून नदीपात्रात शिरते, हे स्पष्ट होणार आहे.