अध्याय पंचविसावा
भगवंत उद्धवाला सत्व, रज आणि तमोगुणी माणसाच्या स्वभावाची वैशि÷dय़े समजावून सांगत आहेत. ते म्हणाले, सत्वगुणी माणसाच्या स्वभावात सत्वगुणाचे अधिक्मय असते. त्यामुळे त्याचे चित्त सदासर्वकाल सुप्रसन्न असते आणि काम, क्रोध व लोभ यांचे स्फुरण मुळीच स्फुरत नाही. तो विषयसंगामध्ये गुंतत नाही. माझ्या ज्ञानामुळे चित्त विषयात असूनही, त्या विषयांपासून तो अलिप्त असतो. देहाला मरणाचे भय हे नेहमीचेच आहे. ते देहाजवळ येऊन ठेपले तरी सात्त्विकाच्या मनात भय उत्पन्न होत नाही, कारण सात्त्विक भक्ताला माझ्यासारखेच अधिकार असल्याने त्याला मरणाचे भय नाही. आता रजोगुणी माणसाचे स्वभाव वैशिष्टय़ ऐक. कर्म करत असताना जर त्याची बुद्धी चंचल, ज्ञानेंद्रिये असंतुष्ट, कर्मेंद्रिये अस्वस्थ आणि मन भ्रांत झाले असेल तर रजोगुणाचा जोर वाढला आहे, असे समजावे. रजोगुण खवळला असता, आपल्याला हवे असलेले विषयसुख भोगायला मिळेल की नाही याची घोर चिंता उत्पन्न होते. तब्येत बरी असली तरी मन चिंतातुर आणि अत्यंत भ्रांत असते. मुलेबाळे, धन, संपत्तीची अतोनात आवड असल्याने सर्व असतानाही आहे ते तसेच टिकून रहावे या उद्देशाने रजोगुण मनामध्ये स्वार्थ वाढवतो. सतत काही ना काही उद्योगामध्ये राहणे रजोगुणी माणसाचा स्वभावच असतो. उद्धवा! काम, क्रोध, मोह, मद, लोभ, मत्सर इत्यादि विकार उत्पन्न होण्याचे काही कारण नसता त्याच्या मनामध्ये विकाराचे थैमान सतत चालू असते. गाढ अंधाराची रात्रही नव्हे किंवा चांगला स्वच्छ प्रकाशयुक्त दिवसही नव्हे, अशा या दोहोंच्या मधली जशी अंधुक संध्याकाळ असते, त्याप्रमाणे रजोगुण होय. सत्व आणि रजोगुणी माणसांच्या स्वभावाची वैशि÷dय़े मी तुला सांगितली. आता तमोगुणी व्यक्तीची वैशि÷dय़े ऐक. त्याचे लक्षण जडत्व म्हणजे आळशीपणा हे आहे. चित्त जेंव्हा ज्ञानेंद्रियांच्या द्वारा शब्द इत्यादी विषय योग्य रीतीने समजण्यास असमर्थ ठरेल आणि खिन्न होऊन निराश होईल, मन सुन्न होईल, तसेच अज्ञान आणि खेद यांची वाढ होईल, तेंव्हा माणसाच्या स्वभावात तमोगुण वाढला आहे, असे समजावे. चित्तामध्ये अत्यंत गहन चिंता उत्पन्न होऊन दुर्धर मोहामध्ये चित्त गढून जाते आणि कोणत्याही तऱहेचे ज्ञान त्याच्या हृदयामध्ये स्फुरत नाही. अज्ञान, ज्ञानाला पाहून पळत सुटते असा अनुभव आहे. तामसी मनुष्य जागा असला तरी निजल्यासारखा असल्याने त्याच्यातील अज्ञान एव्हढे प्रभावी असते की, ते पाहता पाहता ज्ञानाला गिळून टाकते. ज्याप्रमाणे एखादा आंधळा कसातरी अडखळत चालत असतो त्याप्रमाणे तो कर्मे करतो, त्याला चांगल्या वाईटाचे भानच नसते. त्याचं शरीर म्हणजे आळसाचं गाठोडं असतं. त्यामुळे चित्तवृत्तीचा डोळय़ांवर पडदा येतो. त्याची मनोवृत्ती सदासर्वदा संकल्पांची आणि विकल्पांची मोठमोठी कल्पना उत्पन्न करीत असली तरी तमोगुणामुळे त्या मनाची स्थिती जड होते व संकल्प पूर्ती करण्यासाठी आवश्यक तेव्हढी स्फूर्तीही उत्पन्न होत नाही. त्यातच आणखीही एक चमत्कार असा होतो की, तमोगुणी माणसाच्या चित्ताला आपली चित्तस्फूर्तीच आठवत नाही. तमोवृत्तीची वाढ झाल्याने असे घडते. अशा प्रकारे तमाचे बल वाढले म्हणजे त्यावेळी अज्ञानच मनाला खाऊन टाकते. त्यावेळी मन स्वतःची शक्ती विसरून गेल्याने नष्टप्राय होऊन मूढपणाने मृच्छित होऊन राहते. मन जर निखालस नाहीसेच झाले असते, तर महादुःख कोणी भोगले असते? यासाठी नाईलाजाने तमाशी एकरूप होऊन मन जडमूढरूपाने तेथे शिल्लक उरते. उद्धवा! अशा रीतीने जी मूर्खपणाची वागणूक होते, ती अत्यंत दुःखदायक असते. यालाच तमाची स्थिती असे नाव आहे. उद्धवा! सत्त्वगुण वाढल्यावर देवतांचे, रजोगुण वाढल्यावर असुरांचे आणि तमोगुण वाढल्यावर राक्षसांचे बळ वाढते. त्यानुसार स्वभावामध्ये अनुक्रमे देवत्व, असुरत्व आणि राक्षसत्वप्रधान, निवृत्ती, प्रवृत्ती किंवा मोह यांचे प्राबल्य दिसून येते. दैवी, आसुरी आणि राक्षसी स्थिती हीच तीन प्रकारच्या गुणांची संपत्ती आहे.
क्रमशः