रात्रभर नरकासुरांचेच राज्य, पहाटे दहन : अनेक ठिकाणी वाढली वाहतूक कोंडी,तरीही दोन वर्षांनंतर मनसोक्त दिवाळी
प्रतिनिधी /पणजी
नरकासुर दहनाने गोव्यात सर्वत्र शहरात, गावोगावी दिवाळीचा धुमधडाका सुरु झाला असून तो बुधवारपर्यंत चालणार आहे. आज सोमवारी 24 ऑक्टोबर रोजी दिवाळीबरोबरच लक्षीपूजन असून ते घराघरातून तसेच दुकानांतून करण्यात येणार आहे तर मंगळवार दि. 25 ऑक्टोबर रोजी खंडग्रास सुर्यग्रहण असून दिवाळीचा तसा कोणताही खास कार्यक्रम नाही.
बुधवारी दि. 26 ऑक्टोबर रोजी बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा तसेच भाऊबीज असे दिवाळीचे दोन सण आले आहेत आणि ते पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यात येणार आहेत. त्यानंतर दिवाळीची सांगता होणार असली तरी गोव्यात ‘व्हडली दिवाळी’ म्हणजेच तुळशी विवाह पंधरवडय़ाने येणार असून या दिवाळीनंतर त्याची तयारी केली जाणार आहे.
रात्रभर नरकासुरांचेच राज्य
काल रविवारी रात्रभर राज्यातील शहरात तसेच गावोगावी नरकासुर तयार करण्यात आले. त्यांना रात्रभर सजवण्यात आले आणि पहाटे त्यांना जाळून दिवाळीच्या उत्सवाचा पारंपरिक पद्धतीने शुभारंभ करण्यात आला. काही राजकारणी लोकांनी नरकासुराची अर्ध्यापेक्षा जास्त तयारी झाल्यानंतर ते नकोत, त्यांची प्रथा बंद करा आणि नरकासुरांना देणग्या देऊ नका अशी विधाने केली. परंतु, त्यास कोणी किंमत दिली नाही. काही राजकारण्यांनीच त्यांच्या विधानास विरोध करुन ती विधाने खोडून काढली.
अनेक ठिकाणी रात्री वाहतूक कोंडी
लोकांनी आपल्या घराघरांवर आकाशकंदील पेटवून तसेच पोहे खाऊन पारंपरिक रिती – रिवाजानुसार दिवाळी साजरी केली. पणजी, मडगांव व इतर शहरातही मोठेमोठे नरकासुर उभे करण्यात आले होते आणि त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. लोक आपापली वाहने घेऊन रात्रभर नरकासुर पाहाण्यासाठी फिरत असल्याचे दिसून आले. शिवाय रात्रीच्या वेळी वाहने वाढल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे निदर्शनास आले.
दोन वर्षांनंतर मनसोक्त दिवाळी
गेली दोन वर्षे कोरोना महामारीत गेल्यामुळे दिवाळी उत्सव लोकांना मनसोक्तपणे साजरा करणे शक्य झाले नव्हते तसेच नरकासुराचे प्रस्थही कमी झाले होते. परंतु यंदा कोरोनाचे संकट ओसरल्याने दिवाळीचा उत्साह पुन्हा एकदा द्विगुणीत झाल्याचे दिसून आले. लोकांनी दिवाळी खरेदीसाठी केलेली गर्दीच सर्व काही सांगून गेली. घरोघरी पणत्यांची आरास करुन रांगोळी घालून दिवाळी साजरी करण्यात आली. अनेक संस्था – क्लबांनी दिवाळीनिमित्त विविध कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन केले असून अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमही होत आहेत. मंदिरांवरही रोषणाई करण्यात आली असून दिवाळीसाठी कपडे, मिठाईची व इतर दुकाने खरेदी विक्रीसाठी सज्ज झाल्याचे दिसून आले.