इतिहासप्रेमींनी घेतलीय गंभीर दखल
प्रतिनिधी /मडगाव
चांदर येथील रहिवासी आणि इतिहासकारांनी चांदर येथील कदंब कालीन महादेव मंदिराचा नाश होण्याची भीती व्यक्त करून, त्याच्या सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामांची गंभीर दखल घेतली. त्या ठिकाणाहून ऐतिहासिक मूल्य असलेले दगड चोरीला गेले असावेत असा त्यांचा अंदाज आहे. पुरातत्व विभागाने या ऐतिहासिक वारसास्थळाचे नुतनीकरण करू नये, असे आवाहन इतिहासप्रेमींनी केले आहे.
अनेकांनी असा दावा केला आहे की, मंदिराच्या पायासाठी वापरल्या गेलेल्या विटांचे पुरातत्व मूल्य आहे, ज्याचे जतन करणे आवश्यक आहे. मात्र, सुरू असलेल्या कामामुळे त्या जुन्या विटा दिसत नसल्याने त्यावर बांधकाम करण्यात आले आहे.
इतिहासप्रेमीं योगेश नागवेकर म्हणाले, ‘त्यांनी स्थानिक इतिहासकारांकडून मार्गदर्शक तत्त्वे’ घ्यायला हवी होती. चांदर ही त्यावेळी गोव्याची राजधानी होती हे आपणा सर्वांना माहीत आहे. 1930 मध्ये सापडलेले मंदिराचे अवशेष मोहम्मद तुघलक आणि पोर्तुगीजांनी लोकांच्या केलेल्या छळाची साक्ष देतात.’
ते पुढे म्हणाले की, नंदीची भंगलेली मूर्ती हे मंदिराच्या विध्वंसाचे प्रतीक आहे. हे ठिकाण गर्भकुंड, नंदीच्या बाजूला असून अजून संशोधन आवश्यक आहे.
इतिहासकार प्रा. प्रजल साखरदांडे यांनी म्हटले आहे की, याआधी 1624 मध्ये आग्वाद किल्ला कारागृहाचे नूतनीकरण करण्यात आले होते. तांबडी सुर्ला येथील मंदिरावर सिमेंट टाकण्याचा प्रयत्न रोखण्यात आला होता.
साखरदांडे यांनी 1930 मध्ये चांदर येथे फादर हेन्री यांनी केलेल्या उत्खननात सातवाहन काळातील विटांच्या वास्तू सापडल्याचा दावा केला. तेव्हा नाणे देखील सापडली होती. ‘तिथल्या दगडी बांधकामाला संरक्षण न देता नवीन बांधकाम करण्यात आले आहे. नूतनीकरणाच्या नावाखाली ऐतिहासिक दगडांची विक्री झाली असावी. राज्यात संताप व्यक्त होत असून मंदिराचे फोटो व्हायरल झाले आहेत असे प्रा. साखरदांडे यांनी म्हटले आहे.