ऑनलाईन टीम / तरुण भारत :
काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी मेलोड्रामा सोडून कायदा-सुव्यवस्था आणि राजकारणात काय चालते आणि काय नाही, याचे आत्मपरीक्षण आपापसात केले पाहिजे. एक दिवस जनता निर्णय घेईल. सध्या न्यायालयाने प्रक्रियेचे पालन करत राहुल गांधींना शिक्षा केली आहे, त्यामुळे त्यांनी कायदा आणि राज्यघटनेचा आदर केला पाहिजे. सध्या घोडय़ांसोबत गाढवांची शर्यत लावली जात आहे. हे गंभीर असून, आत्मपरिक्षण करण्यासारखे आहे, अशी बोचरी टीका केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी राहुल गांधींवर केली.
राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यात सुरत न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली. त्यामध्ये त्यांना जामीनही मिळाला. मात्र, शिक्षा झाल्याने त्यांची खासदारकी रद्द झाली. देशभरातील विरोधी पक्षनेते आणि कार्यकर्त्यांकडून या कारवाईविरोधात निदर्शने केली जात आहेत. याबाबत मंत्री हरदीपसिंग पुरी यांना मीडियाने प्रश्न विचारला. त्यावर बोलताना हरदीप सिंग पुरी म्हणाले, तुम्हाला घोडय़ाची शर्यत चालवण्यासाठी गाढव मिळतंय, ते खरंच गंभीर असून, आत्मपरीक्षण करण्यासारखं आहे.
दरम्यान, प्रियांका गांधी यांनी प्रभू रामाबाबत केलेल्या वक्तव्यावरही पुरी यांनी निशाणा साधला. कुठे प्रभू रामचंद्र आणि कुठे हे लोक. मी सावरकर नाही, मी माफी मागणार नाही. त्यांना वीर सावरकरांसारख्या लोकांचे योगदान माहित आहे का? एखाद्या गाढवाला घोडय़ाच्या शर्यतीत पाहिल्यासारखं आहे. भारतातील जनतेला निर्णय घेऊ द्या. जर न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली असेल तर त्याने न्यायालयीन प्रक्रियेतून बोलले पाहिजे.