पुणे / प्रतिनिधी :
ज्या-ज्या देशांमध्ये धर्माच्या आधारावर ध्रुवीकरण झाले, त्या देशांची आज काय अवस्था आहे, हे अफगाणिस्तानची वा पाकिस्तानची परिस्थिती बघून लक्षात येते. त्यामुळे शाश्वत विकासाची वाट सोडून ध्रुवीकरणाचा मार्ग धरणे घातक आहे. अल्पकालीन फायद्यासाठी तुम्ही समाजाचे दीर्घकालीन नुकसान करणार आहात का, असा सवाल राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला.
ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अहमदनगर, कोल्हापूर येथे घडलेल्या घटनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी वरील मत व्यक्त केले. ते म्हणाले, जगाचे राजकारण बघितले, तर अशा ध्रुवीकरणाने कसा सत्यानाश होतो, हे ध्यानात येईल. या देशात कोणताही धर्म असो, त्या देशाची काय अवस्था झाली आहे, हे आपण पाहतो आहोत. त्यामुळे याबाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तरुणाईच्या हातात दगड दिले, तर तो दगड भिरकवण्यासाठी द्यायचा की रचण्यासाठी द्यायचा, हे आम्हाला आधी ठरवावे लागेल. समाजामध्ये फूट पाडणे धोकादायक असून, हे थांबले पाहिजे.
आपण कायम असे म्हणतो की जात आणि धर्म दगड आहेत. मग त्या दगडाची भिंत बांधली तर समाज तुटतो आणि त्या दगडाचा पूल बांधला तर समाज जोडला जातो. त्यामुळे समाज जोडला जाऊन राष्ट्रहित साधण्यासाठी त्या दिशेने पावले टाकली गेली पाहिजेत. सर्वच राजकारण्यांनी पुढच्या पिढीचा विचार करून, येणाऱ्या भविष्यकाळाचा विचार करून प्रक्षोभक विधाने टाळायला हवीत. कारण यामुळे देशाचे प्रश्न सुटणार नाहीत. ज्या मोर्चामुळे हे घडले आहे, त्या मोर्चानंतर किती रोजगार आले? त्या मोर्चामुळे ज्या डाळींच्या भावाने शंभरी ओलांडली आहे ते शंभरच्या अलीकडे आले? असे प्रश्न उपस्थित करत माझ्या देशासमोरचे प्रश्न महागाई व रोजगारी हे आहेत. विषयांतर करण्यासाठी अशा पद्धतीचे काम केले जात असल्याचा आरोप डॉ. कोल्हे यांनी केला.
पुन्हा उमेदवारी म्हणजे मला दिलेली शाबासकी
पक्षाने मला पुन्हा दिलेली उमेदवारी ही मला दिलेली शाबासकी आणि विश्वास आहे, अशी प्रतिक्रियाही डॉ. कोल्हे यांनी दिली.