माणसाचे सर्व अवयव महत्त्वाचे आहेत. बोटाच्या करंगळीसह. कधीतरी इजा झाली तर आयुष्यात अवयवाची उपयुक्तता लक्षात येते. म्हणून असेल कदाचित, पण भाषेमध्ये अवयव ठळकपणे व्यवहारात डोकावतात. आपले दोन्ही हात वाक्प्रचार आणि म्हणी यांनी वेढून बांधले आहेत. ‘हात दाखवून अवलक्षण’, ‘नुसते हातावर हात ठेवून काय होणार?’, ‘हातातोंडाशी गाठ’, ‘हातावरचे पोट’… वगैरे. जसे पादुका या पायातील उर्जेसाठी महत्त्वाच्या तसे हात हे नमस्कारासाठी आध्यात्मिक क्षेत्रात आणि सार्वजनिक कार्यासाठी राजकारणात देखील आपली ठळक जागा मिळवून आहेत. टाळी ही सुद्धा एका हाताने वाजत नाही. तिला दोन हात हवे असतात. हात आणि बोटे यांची मूक भाषा आहे. श्रुतीवाचून वंचित राहिलेल्या माणसाचे संवादमाध्यम हात आहेत आणि जिथे आवाज गैरहजर रहावा असे वाटते तिथे हात मोठे गुपित सांगून जातात. कपाळावरचा हात चिंतेचा, नशिबाचा तर हृदयावरचा हात श्रद्धा आणि प्रेमाचा. निरोपाचा हात रडवेला तर क्वचित सुटलो बुवा एकदाचे या निश्चिंततेचा. खाणे, येणे, जाणे, देहधर्म, मारणे, ठोकणे सर्व न बोलता सांगून जातात ते हातच. विजयाची दोन बोटे मनातला आनंद व्यक्त करतात. पाच बोटे म्हणजे जणू पंचामृत. पाच बोटांची मूठ तयार होते. मुठीमधली शक्ती वेगळी सांगायला नको. मूठ हे स्वयंपाकघरातील एकेकाळी माप होते. मूठभर भिक्षा हे दान होते. जेवढी मूठ तेवढेच माणसाचे पोट असते. म्हणून तितकेच अन्न त्याला पुरते.
देवाच्या प्रसादासाठी म्हणून नेहमी उजवा हात पुढे येतो, त्याचे डाव्या हाताला वाईट वाटते. डावा हात म्हणतो, माझे सहकार्य असल्याशिवाय कामे फत्ते होत नाहीत. तरी मला दुय्यम स्थान का? घोडेस्वारी करताना लगाम माझ्या हातात. तलवार चालवताना घाव चुकवायला ढाल माझ्या हातात. परंतु तलवारीने शत्रूचा घात केला म्हणून श्रेय सारे उजव्याकडे. शिवाय विजयाचे बक्षीस घ्यायला हाच पुढे पुढे करतो. उजवा हात लक्षवेधी आहे, कारण तो दानधर्म करतो. उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हातालाही कळू नये असे म्हणतात. उजव्या हाताला म्हणून मान मिळतो आणि डावा हात सकाळी निषिद्ध काम करतो म्हणून त्याला दूर सारले जाते. मात्र बदलत्या जीवनशैलीमध्ये डाव्या हाताचे सकाळी चालणारे काम हळूहळू काळाच्या लाटेत वाहून जाणार आहे. पंढरपूरचा आमचा लाडका विठोबा दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा आहे. जणू सांगतो आहे की डावा-उजवा हा भेद माझ्याजवळ नाही. माझ्याजवळ येणारे सारेच भक्त समान आहेत. त्यांना भक्ती, प्रीती, आणि समतेचे वरदान मी दृष्टीने देतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया. कोल्हापूरची महालक्ष्मी ही चतुर्भुज आहे. मातुलिंग, गदा, खेटक आणि पानपात्र या चार वस्तू तिने धारण केल्या आहेत. ही अंबाबाई रोज दुपारी श्री दत्तप्रभूंना दोन्ही हातांनी भिक्षा वाढते. बंगालमध्ये दुर्गापूजा उत्सव मोठय़ा थाटामाटात साजरा होतो. तेव्हा तिची मातीची मूर्ती ही दशभूज असते. महाराष्ट्राची लोकप्रिय तुळजाभवानी आई ही अष्टभुजा आहे. तूर म्हणजे गती. तुरजाचे तुळजा झाले. ती आदिशक्ती पार्वती त्वरित धावत येऊन भक्तांचे असूरांपासून रक्षण करते. म्हणून ती अष्टभुजा आहे.
‘श्रम ही श्रीराम है हमारा’ असा नारा देणाऱया आनंदवनात एक पाटी आहे. ‘हात हे उभारण्यासाठी असतात. उगारण्यासाठी नव्हे.’ विवाहसंस्कारामध्ये पाणिग्रहण नावाचा महत्त्वाचा विधी आहे. नियोजित वधूचा हात कायमचा हाती घेणे म्हणजे पाणिग्रहण. वर वधूचा हात हाती घेऊन अग्नी प्रदक्षिणा करतो आणि म्हणतो, ‘हे वधू, पती प्राप्त झालेली तू माझ्यासह वृद्धावस्थेपर्यंत जाशील. तुझा हात मी सौभाग्यासाठी हाती घेतलेला आहे. भग, अर्यमा, सविता, आणि पुषा हे देव तुला गृहस्थाश्रमाच्या कार्यासाठी मला देते झाले’. स्त्री ही शक्तिदेवता आहे. श्रीरामच सीतेचे पाणिग्रहण करू शकले. अत्री आपल्या तपःसामर्थ्यामुळे तेजस्वी अनसूयेचा हात धरू शकले. हातांमधून ऊर्जालहरिंचे संक्रमण होते म्हणून हस्तांदोलन ही भारतीय पद्धत नाही. तर हात जोडून नमस्काराला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मानाचे स्थान आहे. शिष्याच्या मस्तकी उजवा हात ठेवण्याचा अधिकार केवळ आपल्या सद्गुरूंना असतो. इतरांना नसतो, असे समर्थ रामदास स्वामींनी म्हटले आहे. मस्तकावर हात ठेवून सद्गुरू पूर्वजन्म आणि वर्तमान जन्मातील प्रारब्ध भोगण्यासाठी सकारात्मक ऊर्जालहरी प्रदान करतात. मेंदूमध्ये संचिताचा साठा असतो आणि कर्मगतीनुसार तशी बुद्धी होते. सद्गुरू कर्मामध्ये ढवळाढवळ न करता फक्त शक्ती प्रसारित करतात. प.पू. नाना महाराज तराणेकर म्हणत, सद्गुरूंचे चरित्र म्हणजे अमृताची पाणपोई असते. बुडकुले घेऊन येणाऱयाला बुडकुल्यात अमृत मिळेल. तांब्या आणणाऱयाला तांब्यातून. पातेले आणेल त्याला पातेल्यातून अमृत मिळेल. एक गोष्ट मात्र नक्की की सर्वांना अमृत मिळेल. ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार हे वाटप होईल. कोणीही विन्मुख जाणार नाही. सद्गुरू कुणालाही रिकाम्या हाताने पाठवत नाहीत.
आपल्या हाताची ओंजळ ही देण्यासाठी असते. मग ती फुले असोत की अर्घ्य किंवा ओटीचे धान्य. अर्पण ही तिची ओळख आहे. व्याकरण महाभाष्याचे कर्ते, योगदर्शनाचे प्रणेते, आणि आयुर्वेदातील चरकपरंपरेचे जनक पतंजली म्हणजे शेषाचा अवतार. त्यांच्याविषयी आख्यायिका अशी आहे की शिवाचे तांडव नृत्य बघण्यासाठी म्हणून शेषाने विष्णूच्या आज्ञेनुसार पृथ्वीवर अवतार घ्यायचे ठरवले आणि गोणिका नावाची एक स्त्री पुत्रप्राप्तीसाठी तप करत असलेली शेषाला दिसली. हीच आपली माता असे मनोमन ठरवून ती सूर्याला अर्घ्य देत असताना शेष सूक्ष्मरूपाने तिच्या ओंजळीत पडला. ओंजळीतले पाणी खाली पडताच तो बालक रूपाने तिच्यापुढे प्रगट झाला. प्रेमभराने त्याला उचलून घेत गोणिका म्हणाली, तू माझ्या अंजलीतून पतन पावलास म्हणून मी तुझे नाव पतंजली असे ठेवते. संत तुकाराम महाराज विठोबाला
म्हणतात, ‘हातीचे न संडावे देवे । शरण आलो जीवेभावे । आपले ऐसे म्हणावे । करितो जीवे निंबलोण।।’ मला हाताशी धरले आहेस तर मला आपला म्हण. मी तुला शरण आलो आहे. तुझ्यावरून मी जिवाचे निंबलोण उतरवून टाकीन. आपला तरुण मुलगा हाताशी कधी येईल याची वाट ज्याप्रमाणे उत्सुकतेने पिता बघत असतो. त्याप्रमाणे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी बाबा बेलसरे यांची वाट बघितली. कुणापुढे हात पसरणे ही लज्जास्पद गोष्ट आहे असे वाटते. परंतु श्री दत्त महात्म्य या ग्रंथात प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी म्हणतात, ‘तू भक्ताधीन सतत। मी मागतो पसरून हात। या ग्रंथी सतत सानिध्य ठेवी।।’ संतांपाशी जावे आणि म्हणावे…. ‘हाती नाही येणे, हाती नाही जाणे, हसत जगावे, हसत मरावे, हे तर माझे गाणे..’
– स्नेहा शिनखेडे