डॉ. एम. आर. जयराम : केएलई संस्थेच्या 110 व्या स्थापनादिनामित्त कार्यक्रम
बेळगाव : केएलई संस्थेचा समाज बदलणारा एक अद्भूत शैक्षणिक प्रवास आहे. डॉ. प्रभाकर कोरे यांनी शिक्षणाची असंख्य झाडे लावली आहेत. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज संस्थेने गरुडझेप घेतली आहे. यासाठी डॉ. प्रभाकर कोरे यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. केएलईच्या उभारणीत डॉ. प्रभाकर कोरे यांचे योगदान मोठे, असे गौरवोद्गार एम. एस. रामय्या व्यवहारिक विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एम. आर. जयराम यांनी काढले. येथील जेएनएमसीच्या डॉ. बी. एस. जिरगे सभागृहात केएलई संस्थेच्या 110 व्या स्थापनादिनामित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, संस्थेचे अध्यक्ष महांतेश कौजलगी, सचिव डॉ. बी. जी. देसाई, अजीवन सदस्य मंडळाच्या कार्याध्यक्षा डॉ. दीपा मेटगुड आदी उपस्थित होते.
जयराम म्हणाले, सप्तऋषींनी समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र काम केले आहे. त्यांचा त्याग व दूरदृष्टीने ही संस्था विकसित झाली आहे. सप्तऋषींनी उदात्त गोष्टींचा विचार करून संस्थेची वाटचाल पुढे नेली. राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेला पाठिंबा देण्यासाठी केएलईने विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित यावर लक्ष्य केंद्रित असणारे एसटीईएम विद्यापीठ स्थापन करण्याचे आवाहन त्यांनी केले. रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी बोधमयानंद महाराज म्हणाले, केवळ ज्ञानाची शक्तीच समाज व राष्ट्राला सक्षस बनवू शकते. ज्ञानाची तहान भागविणाऱ्या व या प्रदेशात साहित्यिक क्रांती घडवून आणणाऱ्या केएलई संस्थेच्या सप्तऋषींनी मोठा त्याग व परिश्रम करून संस्थेची उभारणी केली. आजच्या समाजात तीव्र मानसिक ताण व सोशल मीडियाच्या अतिरेकामुळे लोक आपला मार्ग भरकटत आहेत. तरुण पिढी कधीकधी अभिमान व प्रेमाच्या भ्रमात मोठ्या चुका करते. यामुळे अध्यात्माकडे वळणे आवश्यक असून हृदयात देशभक्तीही कायमची स्थापित होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
डॉ. प्रभाकर कोरे यांनी केएलईची स्थापना करणाऱ्या संस्थापक, दानशूर व सप्तऋषींना आदरांजली वाहून, केएलई संस्था लोकशाहीच्या पायावर उभी आहे. शिक्षण, आरोग्य व संशोधन क्षेत्रात अद्वितीय योगदान देऊन राष्ट्र उभारणीत केएलईचे संस्थापक, दानशूर व सप्तऋषींनी स्वत:चे योगदान दिले आहे. 2025 मध्ये उत्तर कर्नाटकातील पहिले कृषी महाविद्यालय सुरू करणे ही एक संस्थेची महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. हुबळीमध्ये 1 हजार बेड्सचे हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालयाचे लवकरच उद्घाटन केले जाणार आहे. केएलईची क्षमता 4500 बेड्सपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष महांतेश कौजलगी यांनीही मनोगत व्यक्त पेले. यावेळी राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविणाऱ्या संस्थेच्या प्रतिभावंतांचा गौरव करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते. डॉ. नेहा दडेद, डॉ. महेश गुरनगौडर, डॉ. आदित्य आचार्य यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दीपा मेटगुड यांनी आभार मानले.









