पणजी हवामान खात्याचा अंदाज : बागायतींवर होऊ शकतो परिणाम.सर्वांना सावध राहण्याचे आवाहन
प्रतिनिधी /पणजी
तामिळनाडूमध्ये आलेल्या ‘मॅनडोस’ चक्रिवादळाचा परिणाम म्हणून गोव्यातही आजपासून 13 डिसेंबर या दरम्यान तुरळक पावसाच्या सरी पडतील, असा पुन्हा एकदा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
पणजी वेधशाळेने या संदर्भात शुक्रवारी सविस्तर माहिती दिली आहे. या अगोदर वेधशाळेने दि. 8 डिसेंबरपासून पावसाची शक्यता व्यक्त केली होती. मात्र दि. 8 व 9 डिसेंबर रोजी पावसाऐवजी पहाटेच्या दरम्यान कडक थंडी पडली. तामिळनाडूतील चक्रिवादळामुळे पावसाचे ढग सर्वदूर पसरले, त्यातच अरबी समुद्रात देखील ढगांचा एक मोठा पुंजका तयार झालेला आहे. तो पश्चिमेच्या दिशेने सरकत नाहे. कदाचित त्याचाही परिणाम होऊन गोव्यात पुढील दोन दिवसात पाऊस पडू शकतो, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
शुक्रवारी तापमान घसरले
शुक्रवारी पणजीत सर्वात कमी म्हणजेच 18.7 डि. से. एवढे तापमान खाली आले होते. राज्यात सर्वत्र शुक्रवारी व गुरुवारी पहाटे देखील कडक थंडी पडली होती. कमाल तापमान दुपारच्या वेळी 32.8 डि.से. एवढे होते. वाहणारे वारेही थंड असून ओठ फुटू लागले आहेत.
मंगळवारपर्यंत हलक्या पावसाची शक्यता
दरम्यान आज दि. 10 डिसेंबरपासून दि. 13 डिसेंबर या दरम्यान हलक्या स्वरुपातील पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दि. 12 व दि. 13 डिसेंबर रोजी विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
पिकांना हानिकारक ठरु शकतो पाऊस
ऐन थंडीच्या या मोसमात हवामान खात्याने अंदाज वर्तविल्याप्रमाणे पाऊस पडल्यास गोव्याती काजु, आंबा, सुपारीच्या पीकावर परिणाम होऊन शेतकऱयांचे नुकसान होऊ शकते. आंबा, काजुच्या मोहराला हा पाऊस हानिकारक ठरतो.
सध्या गोव्यात मोठय़ा प्रमाणात कार्यक्रम, संमेलने, जत्रा, फेस्त, कालोत्सव सुरु आहेत. त्याचबरोबर जागतिक आयुर्वेद परिषदही सुरु आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोव्यात येत असून ते दुपारपासून सायंकाळपर्यंत गोव्यात असतील. अशा काळातच हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविल्यामुळे सर्वांच्याच मनात चलबिचल सुरु आहे.