कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायतला सांडपाण्याचा निचरा करण्यात अपयश : नागरिकांतून नाराजी
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
गावच्या तलावाच्या बाजूच्या रस्त्यावरून प्रवेश करणाऱ्या प्रवेशद्वारावरच सांडपाणी साचल्यामुळे वाहनधारकांना व नागरिकांना सांडपाण्यातून गावामध्ये प्रवेश करावा लागत आहे. ग्रामपंचायत सदर सांडपाण्याचा निचरा करण्यास अपयशी ठरत असल्यामुळे प्रवासीवर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीने या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन रस्ता सांडपाणीमुक्त करून वाहनधारकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे. मागीलवर्षी ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून शासकीय निधीतून गावाजवळील तलावाचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. परंतु सौंदर्यीकरण केलेल्या तलावाच्या बाजूला बाहेर गल्ली येथील नागरिकांचे सांडपाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे तलावाच्या सौंदर्यीकरणात बाधा येत आहे. पूर्वी हेच सांडपाणी तलावाचे सौंदर्यीकरण करण्यापूर्वी तलावातील पाण्यात सोडण्यात आले होते. यामुळे सांडपाण्याची समस्या कुणाला जाणवली नाही. वास्तविक पाहता त्यावेळीच ग्रामपंचायतीने सदर सांडपाण्याचे नियोजन करून सांडपाण्याचा व्यवस्थित कसा निचरा होईल यावर उपाय-योजना आखणे गरजेचे होते. परंतु पंचायतीने ही परिस्थिती लक्षात न घेतल्यामुळे सध्या सदर पाणी तलावाच्या बाजूच्या रस्त्यावरच साचत असून नागरिकांना या सांडपाण्यातून प्रवास करावा लागत आहे.
ग्रा. पं. ला निचरा समस्येचे आव्हान
कोट्यावधीचा शासकीय निधी खर्च करून गावाजवळील तलावाचे सौंदर्यीकरण करण्यात आले. यावेळीसुद्धा ग्रामपंचायतला सदर सांडपाण्याचे नियोजन कसे करणे गरजेचे आहे, हे माहित होते. बाहेर गल्लीतील काही घरातील सांडपाणी तलावाच्या बाजूच्या मेन रस्त्यावर त्यावेळी ही साचत होते आणि आजही साचत आहे. परंतु ग्रा. पं. ला मात्र सदर सांडपाण्याचा निचरा कसा करावा हे मोठे आव्हान आहे. तेव्हा ग्रा. पं. ने कहीतरी उपाय-योजना राबवून सदर सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी योग्य नियोजन करून रस्ता सांडपाणी मुक्त करण्याची मागणी होत आहे.
पीडीओ-लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
बेळगावपासून अवघ्या दोन किमीवर असलेल्या शेतीप्रधान गावाकडे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. कारण एखाद्या विकास कामाची बातमी वृत्तपत्रातून प्रसिद्ध होऊनसुद्धा दुरुस्ती होत नाही. यावरून सदर गावाकडे लोकप्रतिनिधींचेही किती लक्ष आहे, हे दिसून येते. गेले 3 महिने 24 तास घरोघरी पाणी योजनेचे गाजर दाखवत 3 महिने सार्वजनिक नळांना पाणीपुरवठा बंद आहे. याबद्दल ‘तरुण भारत’ वृत्तपत्रातून कित्येकवेळा पावसाळ्यापूर्वी जलदगतीने काम करून नागरिकांना 24 तास पाणी मिळण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रसिद्ध होऊनसुद्धा कोणत्याच लोकप्रतिनिधींनी अजून लक्ष दिलेच नाही. हेच या गावचे दुर्दैव म्हणावे लागेल, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत.