मंगला एक्सप्रेससह सहा ते सात गाड्यांना विलंब
रत्नागिरी प्रतिनिधी
रेल्वे मार्गालगत जळण्यात आलेल्या कचऱ्याचा धूर लगतच्या रेल्वे टनेलमध्ये पसरल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सुमारे ६ ते ७ गाड्याना २ ते ३ तास विलंब झाला . ही घटना काल दुपारी १२ च्या सुमारास घटना घडली. दरम्यान, दुपारी पावणे ३ च्या सुमारास खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यात रेल्वेला यश आले.
कोकण रेल्वे मार्गावर निवसर स्थानकानजिक असलेल्या टनेलजवळ जाळण्यात आलेल्या कचऱ्याचा धूर येथे जवळच असलेल्या रेल्वेच्या टनेलमध्ये पसरला. याचदरम्यान घटनास्थळावरून मंगला एक्सप्रेस जात होती. धुराची झळ बसल्याने मंगला एक्सप्रेससह त्याचवेळी त्या भागातून अप दिशेने जाणारी दिवा सावंतवाडी एक्सप्रेस देखील अडकून पडली. या दोन गाड्यांच्या पाठोपाठ दोन्ही बाजूंनी येणाऱ्या अन्य चार एक्सप्रेस गाड्यांना याचा फटका बसला.
या एक्सप्रेस गाड्यांना बसला विलंबाचा फटका
एर्नाकुलम-एलटीटी दुरंतो एक्सप्रेस, मडगाव -निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस, मडगाव -सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस, अप दिशेने धावणारी मरूसागर एक्सप्रेस, दिवा- सावंतवाडी एक्सप्रेस, सीएसएमटी -मडगाव मांडवी एक्सप्रेस, अमृतसर- कोचुवेली एक्सप्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. निवसरमधील या घटनेमुळे या सर्व गाड्या त्यांच्या निर्धारित वेळेपेक्षा विलंबाने धावत होत्या.