अपेक्षेपेक्षा अधिक विकासवेग, स्टॅन्ली मॉर्गनकडूनही भारताची प्रशंसा
प्रतिनिधी/ नवी दिल्ली
भारताच्या अर्थव्यवस्थेने प्रतिकूल आणि अवघड परिस्थितीतही प्रशंसनीय आर्थिक विकास साध्य केला आहे. नुकत्याच संपलेल्या 2022-2023 या आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 7.2 टक्के राहिला आहे. हा दर अपेक्षेपेक्षाही जास्त असून जगात सर्वाधिक आहे. या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत विकासदर 6.1 इतका राहिला असून चारही तिमाहींचा सरासरी विकासदर 7.2 टक्के आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने बुधवारी ही आकडेवारी घोषित केली. संपूर्ण वर्षात अर्थव्यवस्था 6.5 टक्के वेगाने वाढेल असे प्राथमिक अनुमान होते. तथापि, ते मागे टाकत अर्थव्यवस्थेने अपेक्षेपेक्षा जास्त दराने प्रगती केली. प्रतिव्यक्ती स्थूल उत्पन्नही या वर्षात वाढले आहे. ते 1 लाख 96 हजार 983 इतके आहे. आगामी तिमाहींमध्ये आर्थिक विकासाचा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जून 2023 या नव्या आर्थिक वर्षाच्या प्रथम तिमाहीत विकासदर 13.1 टक्के राहण्याची शक्यता आहे. तो जवळपास अनुमानाइतकाच असेल. जुलै ते सप्टेंबर 2023 या दुसऱ्या तिमाहीत विकास दर 6.2 टक्के राहण्याचे अनुमान सांख्यिकी विभागाने व्यक्त केले आहे. मागणीत वाढ झाल्याने विकासदर समाधानकारक राहिल्याचे दिसून येत आहे, असे तज्ञांचे मत आहे.
मागच्या वर्षीपेक्षा कमी
नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षातील विकासदरापेक्षा त्याच्या मागच्या आर्थिक वर्षात तो अधिक चांगला, अर्थात, 9.1 टक्के होता. मात्र त्या विकासदराला त्याच्या मागच्या वर्षातील कोरोनामुळे घसरलेल्या आर्थिक विकासदराची पार्श्वभूमी होती. त्या नकारात्मक विकासदराच्या तुलनेत 2021-2022 या आर्थिक वर्षाचा विकासदर अधिक उठावदार होता. तर त्या वर्षात नॉमिनल स्थूल राष्ट्रीय उत्पन्न विकास दर 19.5 टक्के होता. रियल स्थूल राष्ट्रीय उत्पन्न दर 7 टक्के होता. या पार्श्वभूमीवर नुकताच प्रारंभ झालेल्या आर्थिक वर्षाकडूनही मोठ्या विकासदराच्या अपेक्षा बाळगता येऊ शकतात, असे मत काही अर्थतज्ञांनी व्यक्त केले आहे.
स्टॅन्ली मॉर्गनकडून प्रशंसा
पंतप्रधान मोदी यांच्या 9 वर्षांच्या कार्यकाळात भारताचा पूर्णपणे कायाकल्प झाला असून त्याने आर्थिक प्रगतीची मोठी झेप घेतली आहे, अशी प्रशंसा अमेरिकेतील जगप्रसिद्ध वित्तसंस्था स्टॅन्ली मॉर्गनने केली आहे. गेल्या 9 वर्षांमध्ये भारताने जे निर्णय घेतले आणि ज्या धोरणांचा स्वीकार केला, त्यामुळे तो जगात बलशाली देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. अशी कामगिरी आर्थिक महासत्ता म्हणवून घेणाऱ्या अमेरिका, जर्मनी आदी देशांनाही करता आलेली नाही. जर्मनी मंदीच्या विळख्यात सापडलेला आहे तर अमेरिकेतही वित्तसमस्या निर्माण झाली आहे. मात्र कोरोनाच्या झाकोळावर मात करत भारताने अपेक्षेहूनही अधिक विकास दर गाठून स्पृहणीय कामगिरी केली आहे. आता भारतात मंदी येण्याची कोणतीही परिस्थिती राहिलेली नाही. जगातील मोठ्या देशांमध्ये मंदीची शक्यता नसलेला भारत हा एकमेव देश आहे, अशी भलावण या संस्थेने केली आहे. गेल्या 9 वर्षांमध्ये भारतात व्यक्तीगत उत्पन्नात वेगाने वाढ झाली. भारताचा शेअरबाजार जगातील पाचव्या क्रमांकाचा मोठा शेअरबाजार बनला. गेल्या वर्षी भारताने अर्थव्यवस्थेच्या आकारमानात फ्रान्सलाही मागे टाकले. भारताचे भांडवली बाजार मूल्य 3 लाख कोटी डॉलर्सपेक्षाही अधिक, अर्थात 3.31 लाख कोटी डॉलर्स (जवळपास 3 कोटी कोटी रुपये) इतके झाले आहे. विदेशी थेट आणि संस्थात्मक गुंतवणुकीचे प्रमाण आतापर्यंत कधी नव्हते इतके वाढले आहे. आता भारत ही गुंतवणुकीसाठी सर्वात आकर्षक स्थानांपैकी एक झाला आहे, अशी भलावण या वित्तसंस्थेने तिच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात केली आहे.
आर्थिक वर्षाची सांगता समाधानकारक
ड गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत विकासदर अपेक्षेपेक्षा जास्त
ड नुकताच प्रारंभ झालेल्या आर्थिक वर्षातही हाच कल राहण्याची शक्यता
ड व्यक्तीगत उत्पन्न, विदेशी गुंतवणूक आणि उत्पादनाच्या प्रमाणात वाढ