विजय सरदेसाई यांची सरकारवर टीका
प्रतिनिधी/ पणजी
पंचायत आणि ग्रामसभांना त्यांच्या गावांचा विकास करण्याची जबाबदारी, स्वायत्तता आणि अधिकार देण्याऐवजी राज्य सरकार त्यांचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली आहे.
शनिवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकारच्या अशाप्रकारच्या प्रयत्नामुळे सार्वजनिक पायाभूत सुविधा, शिक्षण, कृषी इत्यादी विविध विभागांना राज्य आणि केंद्र सरकारने दिलेले कोटय़वधी रुपये गावांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी वापरण्यात आलेले नाहीत’, असे सदरेसाई पुढे म्हणाले.
येत्या पंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी आधी आपणास किती आणि कोणते अधिकार मिळणार आहेत, याचा अभ्यास करावा. तसेच विजयी झाल्यास आपण घटनेने दिलेल्या अधिकारांप्रमाणे वागणार की राजकर्त्यांच्या हातातील बाहुले बनणार याचाही विचार करावा, असे आवाहन सरदेसाई यांनी केले.
पुढे बोलताना त्यांनी, 73 व्या घटनादुरुस्ती अंतर्गत स्थानिक स्वराज संस्थांच्या अधिकार आणि स्वायत्ततेच्या मुद्यांवर प्रकाश टाकला. त्यासाठी ग्राम विकास समित्या, जिल्हा विकास समित्या आणि राज्य वित्त आयोग अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त केली. तसेच ग्रामपंचायती आत्मनिर्भर आणि ग्रामसभा स्वयंपूर्ण करणे आवश्यक आहे, असे मतही त्यांनी व्यक्त पेले.