पुणे / प्रतिनिधी :
समृद्धी महामार्ग हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मात्र, अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असून, अनेकांची स्वप्ने भंगत आहेत. आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी इतरांची स्वप्ने उद्ध्वस्त करणे ही चुकीची बाब आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केली.
बुलढाणा जिल्हय़ातील सिंदखेडराजा येथे समृद्धी महामार्गावर पहाटे खासगी बसचा भीषण अपघात झाला. यात 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबत बोलताना खडसे म्हणाले, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांची कुटुंबे उघडय़ावर आली आहेत. या घटनेतील सर्व मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्याला शांत लाभो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
समृद्धी महामार्ग हा प्रकल्प पूर्ण झाला तेव्हापासून या महामार्गावर सातत्याने मोठय़ा प्रमाणावर अपघात होत आहेत. अपघातात मोठय़ा संख्येने लोक मृत्युमुखी पावत आहेत. या ठिकाणच्या अपघाताची आकडेवारी पाहिली, तर 100 दिवसात या 900 पेक्षा जास्त लहान-मोठे अपघात झाले आहेत. तसेच शेकडोच्या संख्येने लोक मृत्युमुखी पडले आहेत. एकीकडे समृद्धी महामार्ग हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. दुसरीकडे मात्र या महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या सर्वांची स्वप्ने भंग झाली आहेत, असा चिमटाही खडसे यांनी काढला.