ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिवसेनेविरोधात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडाने महाराष्ट्रात राजकीय अराजक निर्माण झालं आहे. शिंदे यांनी तब्बल ३५ पेक्षा अधिक शिवसेनेचे आमदार फोडल्यानं आता ठाकरे सरकार कोसळणार ही शक्यता दाट आहे. असे असताना शिवसेनेचे १७ ते १८ आमदार भाजपाच्या ताब्यात आहेत असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मी भाजपा हाच शब्द वापरत आहे. त्यांच्या कारस्थानाशिवाय भाजपाशासित राज्यात अशाप्रकारे आमदारांना डांबून ठेवलं जाऊ शकत नाही असंही संजय राऊत (Sanjay Raut) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहे. जे स्वत:ला बछडे, वाघ समजून घ्यायचे ते म्हणजे पक्ष नाही असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, “ईडीची कारवाई आणि भाजपच्या अमिषाला बळी पडून आमदार पळाले असतील. जे स्वत:ला बछडे, वाघ समजून घ्यायचे ते म्हणजे पक्ष नाही. आपण काल रस्त्यावर पाहिला तो पक्ष आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील हा पक्ष अद्याप मजबूत आहे. चार आमदार, खासदार, नगरसेवक गेले याचा अर्थ पक्ष गेला असा होत नाही,” असं संजय राऊतांनी सांगितलं.
सोडून का गेलेत याची कारणं लवकरच समोर येतील. तरीही त्यांच्याशी चर्चा सुरु आहे असंही संजय राऊतांनी म्हटलं. काहीजण संपर्कात असून कशा पद्धतीने जबरदस्तीने नेलं हे सांगत आहेत. दोन आमदार पत्रकार परिषद घेणार असून सगळी गोष्ट सांगतील अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.