50 ते 60 टक्क्यांची जबर वाढ : दरवाढीविरोधात सोमवारी आंदोलन करण्याचा निर्णय
बेळगाव : हेस्कॉमकडून वाढीव वीजबिलाच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक लूट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या महिन्याच्या वीजबिलात तब्बल 50 ते 60 टक्क्यांनी वाढ झाल्याने ग्राहकांचे डोळे पांढरे झाले आहेत. इतर विभागांमध्ये फ्युएल अॅण्ड पॉवर परचेस कॉस्ट अॅडजेस्टमेंट कमी असताना हेस्कॉम विभागातच सर्वाधिक दर आकारण्यात येत आहे. याविरोधात नागरिकांमधून संतापाची लाट उसळली असून वाढीव वीजबिल मागे घेण्याची मागणी केली जात आहे. एकीकडे राज्य सरकारने 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला असताना दुसरीकडे मात्र फ्युएल चार्जेसमधील अॅडजेस्टमेंट कॉस्टच्या नावाखाली 50 ते 60 टक्के विद्युतबिल वाढविण्यात आले आहे. ज्या ग्राहकांचे बिल महिन्याला 600 ते 700 रुपये येत होते, त्यांचे बिल या महिन्यात थेट हजार ते बाराशेपर्यंत पोहोचले आहे. हेस्कॉमच्या काही ग्राहकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत यासंदर्भात तक्रारीही केल्या. परंतु, अधिकाऱ्यांनी हतबलता व्यक्त करत दरवाढ करणे महत्त्वाचे असल्याचे उत्तर दिले. राज्यात दरवर्षी 1 एप्रिलपासून नवीन विद्युत दर लागू केले जातात. यावर्षीही नवे विद्युत दर लागू करण्याची तयारी केईआरसीने केली होती. परंतु, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आल्याने दरवाढ पुढे ढकलण्यात आली. निवडणूक संपताच घरगुतीसह व्यावसायिक मीटरमागे दरवाढ करण्यात आली. यामुळे जून महिन्यात आलेल्या विद्युतबिलात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 50 ते 60 टक्के बिलात वाढ झाल्याने बिल कसे भरायचे? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर आहे.
सोमवारी हेस्कॉम कार्यालयासमोर आंदोलन
हेस्कॉमने या महिन्यात भरमसाट विद्युतबिल दिल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. याविरोधात सोमवार दि. 12 रोजी सकाळी 11 वाजता नेहरुनगर येथील हेस्कॉम कार्यालयासमोर आंदोलन तसेच अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येणार आहे. ह्युमन राईट्स अॅण्ड सोशल जस्टीस संघटनेच्यावतीने हे आंदोलन केले जाणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
एफएसीमध्ये मोठी वाढ – राम बनवानी, वीजग्राहक
हेस्कॉमने एफएसीच्या नावाखाली प्रतियुनिट 2 रुपये वाढविले आहेत. यामुळे मागील महिन्यापेक्षा या महिन्यातील विद्युत बिले भरमसाट आली आहेत. राज्यातील इतर विभागांपेक्षा हेस्कॉमने एफएसीमध्ये मोठी वाढ केल्यामुळेच दरवाढीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. ही दरवाढ हेस्कॉमने लवकर मागे घ्यावी, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा दिला आहे.