राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचे आवाहन : राणी चन्नम्मा विद्यापीठाचा पदवीदान समारंभ
बेळगाव : एकदा मिळविलेले ज्ञान मनुष्याच्या जीवनात कायमस्वरुपी असते. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. कोणत्याही क्षेत्रात मिळविलेल्या कौशल्यानेच यश मिळविता येते. त्यामुळे नवनवीन कौशल्ये शिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी केले. राणी चन्नम्मा विद्यापीठ (आरसीयू) चा 11 वा वार्षिक पदवीदान समारंभ सोमवारी सुवर्ण विधानसौधच्या सभागृहात पार पडला. यावेळी राज्यपालांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. व्यासपीठावर बेंगळूर येथील कर्नाटक राज्य उच्चशिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. बी. तिम्मेगौडा, कुलगुरू प्रा. एम. रामचंद्रगौडा, खासदार मंगला अंगडी उपस्थित होत्या. गेहलोत म्हणाले, आपण मिळविलेल्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी कसा होईल हे विद्यार्थ्यांनी प्रथमत: पाहिले पाहिजे. देशाच्या विकासासाठी बंधूभावाने प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कर्नाटकाने सर्वात प्रथम लागू केले. यामुळे नवीन कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित होण्यास मदत होईल. सरकारने अनेक योजना आखल्या असून देशाचा सर्वांगीण विकास केला जात आहे. त्यामुळे जगातील सर्वात शक्तिशाली देश म्हणून भारताची ओळख निर्माण होईल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.
प्रा. व्ही. तिम्मेगौडा म्हणाले, सध्याच्या परिस्थितीचा सामना करण्यासोबत जगण्याची कला शिक्षणामध्ये असते. यशासाठी कोणताही शॉर्टकट नाही, केवळ कठोर परिश्रमानेच यश मिळविता येते. क्षणाक्षणाला बदलणारे तंत्रज्ञान तरुणांनी आत्मसात करावे, असे त्यांनी सांगितले. कुलगुरू प्रा. एम. रामचंद्रगौडा यांनी प्रास्ताविक करत आरसीयूच्या प्रगतीचा आलेख सादर केला. मान्यवरांच्या हस्ते माजी खासदार कै. सुरेश अंगडी यांना मरणोत्तर मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. खासदार मंगला अंगडी यांनी पदवी स्वीकारली. याचबरोबर एम. के. श्रीधर व प्रा. मल्लेपुरम जी. वेंकटेश यांना शिक्षण व साहित्य क्षेत्रातील मानद डॉक्टरेट देण्यात आली. पदवीदान समारंभात 27 पीएचडी, 11 सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. एकूण 47 हजार 185 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आले.