1000 महिला अभियंत्यांची नियुक्ती : इंद्रधनुष्य कार्यक्रमाची आखणी
नवी दिल्ली
टाटा समूहाची जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन विकास डिजिटल सेवा कंपनी टाटा टेक्नॉलॉजीस लिमिटेडने एक मोठा निर्णय घेतला आहे. 2023-24 मध्ये 1,000 हून अधिक महिला अभियंत्यांची नियुक्ती करण्याची घोषणा कंपनीने केली आहे.
टाटा टेक्नॉलॉजीस लिमिटेडने म्हटले आहे की, कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये भरती करताना महिलांना प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. कंपनीचा ‘इंद्रधनुष्य’ कार्यक्रम सहा महिने चालणार असून या मोहिमेला ‘रेनबो प्रोग्राम’ असे नाव दिले आहे. याद्वारे कंपनी अधिकाधिक महिलांची भरती करून त्यांना विकसित होण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे समजते.
कार्यक्रम सहा महिन्यांचा
महिला कर्मचाऱ्यांना त्यांचे नेतृत्व कौशल्य विकसित करण्यासाठी तसेच त्यांना करिअरमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यास मदत करण्यासाठी सहा महिन्यांचा कार्यक्रम राबवला जात आहे. कंपनीने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये घोषणा केली होती की 12 महिन्यांच्या कालावधीत 3,000 हून अधिक इनोव्हेटर्सना नियुक्त करेल. हे इनोव्हेटर्स ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यात मदत करतील. त्याचवेळी, कंपनी 2023 मध्ये किमान 1,000 अधिक लोकांना नियुक्त करेल, कारण यामुळे व्यवसाय वाढीला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचा दावाही कंपनीने यावेळी केला आहे.