काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची प्रतिक्रिया : सर्वसामान्यांना आर्थिक ओझ्यातून मुक्त करण्याची गरज
प्रतिनिधी /कुडचडे
भाजपला भगव्यापेक्षा तिरंग्याचे महत्त्व अखेर कळले आहे, हे पाहून आनंद वाटतो. भाजपला उशिरा शहाणपण आले हे बरे झाले. राजकीय संधिसाधूपणासाठी प्रतिकात्मक उत्सव व कार्यक्रम आता पुरे झाले. सामान्य माणूस आणि खास करून तरुणांना आर्थिक ओझ्यातून आणि असुरक्षिततेपासून मुक्त करणे ही काळाची गरज आहे. यात भाजप सरकारने लक्ष घातले पाहिजे, असे मत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केले आहे .
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोशल मीडियावर डिस्प्ले छायाचित्र बदलून तेथे तिरंगा तसेच घरोघरी राष्ट्रध्वज फडकवावा, असे आवाहन गोवावासियांना केल्यावर आपले श्रेष्ठ महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांमध्ये आलेल्या या बदलाने नक्कीच आनंद झाला असेल. भगवा हा राष्ट्रध्वज बनवण्याची स्वप्ने पाहणाऱया भाजप भक्तांमध्ये झालेले हे परिवर्तन स्वागतार्ह आहे, असे पाटकर यांनी म्हटले आहे.
अशा या प्रकारामुळे दिसून येते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमच्या तिरंग्याच्या प्रतिकात्मक अर्थांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. भगव्या रंगाचे महत्त्व म्हणजे त्याग व निःस्वार्थीपणा. भाजप नेत्यांनी भौतिक लाभ घेण्याचे सोडून लोककल्याणकारी कामांत स्वतःला झोकून दिले पाहिजे. तसेच आपल्या राष्ट्रध्वजात मध्यभागी पांढरा रंग आहे. आपले आचरण सत्यावर आधारित असावे असा बोध हा शुभ्र रंग देतो. आज भाजप सरकार तथ्ये आणि आकडेवारी लपवून सर्व काही अंधारात ठेवू पाहत आहे, असे पाटकर यांनी पुढे म्हटले आहे.
तिरंग्याचा हिरवा रंग आमचे मातीशी असलेले नाते व येथील वनस्पती जीवनाशी असलेला संबंध दाखवतो. आपण पंतप्रधान आणि मुख्यमंत्री या दोघांकडेही या रंगाच्या प्रतिकात्मक अर्थाच्या अनुषंगाने आत्मपरीक्षण करण्याची मागणी करतो. आपला लहानसा व सुंदर गोवा क्रोनी क्लबकडे सोपवण्याचे व निसर्गसंपन्न भूमीचे पर्यावरण नष्ट करण्याचे भाजपचे कृत्य हे राष्ट्रध्वजातील हिरव्या रंगाच्या प्रतिकात्मक अर्थाशी किती विसंगत आहे याचे भान त्यांनी ठेवावे. पांढऱया रंगाच्या मध्यभागी असलेले ‘अशोक चक्र’ आपणास सत्याच्या मार्गाने जाण्याचा व अंगी सद्गुण बाळगण्याचा संदेश देते. भाजपने या पैलूवरही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण त्यांची राजवट जुमलेबाजी व खोटारडेपणाने भरलेली आहे, अशी टीका पाटकर यांनी केली आहे.
अखंडित वीजपुरवठा, शुद्ध पाण्याचा नियमित पुरवठा, समाजकल्याण योजनांच्या लाभार्थ्यांना वेळेवर आर्थिक साहाय्य, युवकांना रोजगार, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, खड्डेमुक्त रस्ते, अखंड इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विवेकपूर्ण वित्तीय व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. भाजपच्या राजकीय फायद्यासाठी प्रतिकात्मक कार्यक्रम करून आधीच दिवाळखोर झालेले गोवा राज्य त्यामुळे आणखी खोल संकटात गाडले जाईल, अशी प्रतिक्रिया पाटकर यांनी व्यक्त केली आहे.