बेळगाव जिल्हा नामदेव शिंपी समाजाची मागणी
बेळगाव : नामदेव शिंपी समाजाची लोकसंख्या पाच लाखाहून अधिक असली तरी समाजासाठी शासनाने कोणतेही निगम मंडळ स्थापन केलेले नाही. त्यामुळे समाजाची सामाजिक, शैक्षणिक अधोगती झाली आहे. अडचणीत सापडलेल्या समाजासाठी निगम मंडळाची स्थापना करावी, अशा मागणीचे निवेदन बेळगाव जिल्हा नामदेव शिंपी समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. राज्यात शिंपी समाज खरा अल्पसंख्याक असून त्याला सामाजिक सुरक्षा मिळत नाही. समाजातील 90 टक्के जनता शिंपी व्यवसायावरच अवलंबून आहे. मात्र शासनाच्या कोणत्याच सोयीसुविधा मिळत नाही. त्यामुळे व्यवसायही धोक्मयात आला आहे. बेळगाव जिल्ह्यात 31 हजार शिंपी समाज आहे. मात्र हा समाज सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक सुविधांपासून वंचित आहे. 2अ आरक्षण असले तरी समाजाला म्हणाव्या तशा सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे समाजासाठी महामंडळाची स्थापना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन महसूल अधिकारी एस. एम. परगी यांच्याकडे देण्यात आले आहे. यावेळी समाजाचे अजित कोकणे, अशोक रेळेकर, सुहास खटावकर, सुरेश पिसे, महेश खटावकर, हेमंत हावळ, निरंजन बोंगाळे, प्रविण महिंद्रकर, भरत चिर्कोडे, दीपक हावळ, रविकांत पिसे यासह नागरिक उपस्थित होते.