शहरातील नागरिकांच्यावतीने महापालिका आयुक्तांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
शहरवासियांच्या समस्यांचे निवारण करण्यासह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या कायद्यात विविध तरतूदी करण्यात आल्या आहेत. 1976 च्या महापालिका कायद्यातील सेक्शन 13 नुसार नागरिकांचा समावेश असलेली वॉर्ड कमिटी स्थापन करणे आवश्यक आहे. या कायद्यानुसार वॉर्ड कमिटी स्थापन करावी, अशा मागणीचे निवेदन शहरातील नागरिकांच्यावतीने महापालिका आयुक्तांना सोमवारी देण्यात आले.
बेंगळूर, बृहत बेंगळूर, हुबळी, धारवाड, मंगळूर अशा विविध महापालिकांमध्ये वॉर्ड कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. मात्र बेळगाव महापालिकेत वॉर्ड कमिटीची स्थापना करण्यात आली नाही. निवडून आलेल्या नगरसेवकांच्या अध्यक्षतेखाली 10 नागरिकांचा समावेश असलेली वॉर्ड कमिटी निर्माण करणे गरजेचे आहे. मात्र महानगरपालिकेने याची पूर्तता केली नाही. शहरात विविध विकासकामे राबविताना निर्माण होणाऱया अडचणींचे निवारण करणे तसेच नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी महापालिकेला माहिती देण्यासाठी वॉर्ड कमिटीची आवश्यकता आहे.
मात्र बेळगाव महापालिकेने याबाबत कोणतीच कारवाई केली नाही. महापालिकेत वॉर्ड कमिटी स्थापन करण्यासाठी पत्रक प्रसिद्ध करून अर्ज मागविणे आवश्यक आहे. इच्छूक सदस्यांची नावे घेऊन कमिटी स्थापन करणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी याबाबत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून वॉर्ड कमिटी स्थापन करावी, अशा मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांच्याकडे देण्यात आले.
यावेळी बेळगाव सिटीझन वॉर्ड कमिटी स्थापना फोरमच्यावतीने हे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शहरातील नागरिक व फोरमचे पदाधिकारी उपस्थित होते.