पोटाच्या खळगीसाठी खानापूर तालुक्यातील शतायुषी रेणुका गुंजीकर आजही राबताहेत
वार्ताहर /खानापूर
शेतकरी समाज हा काबाड कष्टकरी म्हणून ओळखला जातो. जगाचा पोशिंदा, अन्नदाता असलेल्या शेतकऱयाला रात्रंदिवस काबाडकष्ट करुन राहण्याची सवय लागलेली असते. शेतातील उत्पन्न घेत आपली रोजंदारी करून जगण्याचा आनंद वेगळाच समजला जातो. अलीकडच्या काळात शेतीत राबणे कठीण झाले आहे. यंत्र उपकरणाच्या काळात शेती सोपी झाली असली तरी काबाडकष्ट करून व घाम गाळत जगलेले जीवन अनेकांना आनंददायी ठरते.
ग्रामीण अथवा शहरी भागातील शेतकरी महिला रात्रंदिवस कष्ट करून जीवन जगतानाही पाहिले आहे. परंतु अलीकडच्या अनेक महिलांना शेतात राबणे नकोशे झाले आहे. पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये अडकलेल्यांना दररोज शेतीवाडीत राबल्याशिवाय पर्याय नाही. परंतु अशा अनेक वृद्ध महिलां आपलं अखंड आयुष्य राबण्यातच घालून दिवस काढत राहिल्या आहेत. अनेक वृद्ध महिला शेतात राबून उपजीविकाचे साधन म्हणून रोजंदारी करणाऱया क्वचितच आहेत. अशामध्ये खानापूर शहरातील श्रीमती रेणुका देवाप्पा गुंजीकर नामक शंभरी गाठलेली एक शतायुषी महिला याला अपवाद ठरली आहे.
रोजंदारी हा तिचा छंद आहे. पण, पोटाची खळगी भरण्यासाठी चाललेली तिची धडपड ही तरुण महिलांनाही लाजवेल अशी आहे. तिच्या चेहऱयावरील पडलेल्या सुरकुत्या व तिच्यात असलेली जगण्याची जिद्द ही दणकट व मध्यम वयीन महिलानाही मागे टाकते. अशा या वृद्धेतील राबण्याची ऊर्जा इतर महिलांनी घ्यावी. अशा वृद्ध मातेच्या सदृढ आरोग्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून खानापूर तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. ईश्वर घाडी, सामाजिक कार्यकर्ते रेवणसिद्धया हिरेमठ यांनी मुडेवाडीनजीक शेतीत मोलमजुरी करणाऱया त्या वृद्धेचा शेतातच जाऊन श्रीफळ, शाल घालून सत्कार करून प्रोत्साहन दिले. यावेळी त्यांच्यासमवेत निवृत्त तहसीलदार, संदीप सेमले यासह शेतातील अनेक महिला उपस्थित होत्या.
अन् अश्रू झाले अनावर
यावेळी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना तिला अश्रू अनावर झाले. आपल्याला अखेरच्या श्वासापर्यंत राबल्याशिवाय पर्याय नाही. यासाठी देवाने आपल्या आरोग्याला साथ द्यावी. अशी मागणी तिने देवाकडे केली.