10 तारखेला होणाऱ्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीनंतरच्या निकालानंतर आणि केंद्रातील भाजपची सत्ता गेल्यातनंतर नरेंद्र मोदींना सुद्धा तुरुंगात जावं लागू शकते. त्यांनी जे काही पेरले आहे तेच उगवले आहे. नरेंद्र मोदींनी ज्या गोष्टी पेरलेल्या आहेत, त्याच उद्याच्या राजकारणाचा मुद्दा असल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ते आज पुण्यात वडार समाजाच्या मेळाव्यासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
माध्यमांशी बोलताना आंबेडकर म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकारणातील चोरांना पकडत आहेत. मात्र, त्यांचं पकडणे गैर वाटतं कारण, चोरांना पकडल्यानंतर ती प्रकरणे पूर्णत्वास जात नाहीत. तीन चार वर्षे कारागृहात ठेवून भीतीचं वातावरण निर्माण केलं जातं. पंतप्रधानांचे हे धोरण मानसिकतेवर आघात करण्याचं आहे. त्यामुळे कर्नाटक आणि केंद्रातील सत्ता गेल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदीही तुरुंगात जाऊ शकतात. त्यांनी जे काही पेरले आहे, तेच उगवेल. म्हणून मोदींनी जे पेरलं आहे, तेच उद्याच्या राजकारणाचा भाग होणार.” असा विश्वास प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला.
‘द केरला स्टोरी’चित्रपटावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “‘केरला स्टोरी’ चित्रपटातून काही निष्पण्ण होणार नाही. तो एक प्रसिद्धीचा प्रयत्न आहे.” असे ते म्हणाले.
वादग्रस्त खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर बोलताना “पोस्कोचा गुन्हा दाखल झाल्यावर तातडीने अटक होते. इथे मात्र, गुन्हा दाखल होऊनही ब्रिजभूषण सिंह यांना अटक झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतरच गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर महिला कुस्तीगीरांचा प्रश्न मिटला असे न्यायाधीशांचे वक्तव्य चुकीचे असून पोस्कोचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीला कधी पकडणार हे न्यायालयाने पोलीसांना विचारलं पाहिजे.” असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.