अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत उद्धवाला सांगत आहेत की, सर्व विश्व हे एकाच ईश्वराची निर्मिती आहे आणि ईश्वराची निर्मिती ही सर्वोत्कृष्ठ्च असते. पण मनुष्य त्यात गुणदोष पहात बसतो आणि ईश्वरापासून दुरावतो. तुला माझ्या सगुण रुपाची भुरळ पडली आहे म्हणून तू मला तुमच्याबरोबर वैकुंठाला घेऊन चला असा धोशा लावला आहेस पण माझे सगुण रूप हे मायिक असल्याने नष्ट होणारे आहे म्हणून तू माझ्या ब्रह्मस्वरुपाची ओळख करून घे. त्यासाठी मी सांगतोय तसे वाग म्हणजे तुला ब्राह्मीस्थिती प्राप्त होईल. त्यासाठी पहिले पथ्य म्हणजे कुणाचेही गुणदोष पाहू नकोस. खरं बघितलं तर प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार कर्म करत असतो पण ही गोष्ट लक्षात न घेता स्वत:ला ज्ञानी आणि शहाणा समजणारा मनुष्य त्याला नावे ठेवत असतो. प्रत्यक्षात असं आढळून येतं की, जग हे त्रीगुणयुक्त असून ज्याच्या स्वभावात जो गुण प्रभावी असतो त्यानुसार तो वागत असतो. त्यामुळे जो त्यांच्यातील दोषांवर बोट ठेवेल तोच खरं दोषी ठरतो. मग जगाकडे कसं पहावं असं विचारशील तर सर्व जग हे एकाच ईश्वराची निर्मिती आहे ह्या दृष्टीने एकात्मक भावाने पहावे. त्यातील गुणदोष पहात बसलास तर तू स्वत:चा घात करून घेतलास म्हणून समज कारण समोरच्याचे गुणदोष पहात बसलास की, तू ब्राह्मीस्थिती पासून दुरावतोस. दुसऱ्याचे गुणदोष पाहणारा स्वत:ला ज्ञानी समजत असतो. त्याला त्याच्या ज्ञानाचा अभिमान वाटत असतो आणि त्यातूनच तो दुसऱ्याची निंदा किंवा स्तुती करत असतो. अर्थातच जो ज्ञानी असतो त्यालाच अभिमानाने घेरलेले असते. त्याच्यासारखा स्वभाव असलेल्या माणसाची तो उगीच उगीच स्तुती करतो आणि ज्याच्याशी त्याचे पटत नाही त्यांची तो यथेच्छ निंदा करत असतो. जिथं निंदा स्तुतीचा विचार उत्पन्न होतो तिथं भेदाभेदाचा उगम होतो. जिथं भेदाभेदाचा उगम होतो तिथं परमार्थाचा नि:शेष नाश होऊन महाअनर्थ ओढवतो. कारण मुळातच प्रपंच मिथ्या आहे मग भेदाभेद खरा कसा असेल? वरवर दिसत असला तरी तो निरर्थक असतो. सर्वजण एकाच ईश्वराची लेकरे असल्यावर त्यांच्यात फरक असणार कुठून? तेव्हा दृढ परमार्थ साधायचा असेल तर निंदा स्तुती करणे ताबडतोब सोडून दे. इंद्रियांची निर्मिती रजोगुणातून होत असली तरी त्यांची वैशिष्ठ्यो तमोगुणी असतात. इंद्रिये विषयसेवन करतात आणि त्यातूनच अभिमान वाढत जातो. खरं बघितलं तर देह हा निर्जीव असतो परंतु मन आत्म्याकडून ऊर्जा घेऊन त्याला जिवंतपणा आणते. त्यामुळे मिथ्या प्रपंच खरं वाटू लागतो. मीकर्ता आहे असा अभिमान वाटू लागतो. हे सर्व मज ईश्वराचे ज्ञान नसल्याने घडते. जोपर्यंत हे ज्ञान मिळत नाही तोपर्यंत अज्ञानरूपी दीर्घ स्वप्नात मनुष्य प्रपंचाचा विस्तार करत बसतो. त्यातच जन्म, मरण इत्यादि कल्पना लढवतो. वास्तविक पाहता जन्म आणि मरण हे दोन्ही मिथ्या आहेत कारण देह हा नाशवंत असला तरी त्यातील आत्मा अमर आहे हेच खरे ज्ञान आहे. मग जन्म मरणाचा विषय येणार कुठून? प्रत्येकजण स्वत: परिपूर्ण ब्रह्म आहे आणि हेच त्याचे निजस्वरूप आहे. त्यात कोणताही भेदभाव नाही, शुभाशुभ असेही काही नाही. आत्म्याला जन्मही नाही तसेच मरणही नाही. हेच निखळ सत्य आहे पण मनुष्य तेच लक्षात घेत नाही. संसार हा मृगजळाप्रमाणे आहे. मृगजळ खोल आहे की उथळ, गोड आहे की खारट ह्या चर्चा ज्याप्रमाणे निरर्थक आहेत त्याप्रमाणे प्रपंचातील माणसांच्या गुणदोषांची चर्चा निरर्थक आहे किंवा अमावस्येच्या रात्री सर्वत्र निबिड अंधार पसरलेला असतो. त्या अंधाराची घनदाटता मोजणे वेडेपणाचे होय. त्याप्रमाणे प्रपंच निखालस खोटा असल्याने कानांनी ऐकलेल्या मिथ्या गोष्टींवर किंवा डोळ्यांनी पाहिलेल्या मिथ्या घटनांवर कितपत महत्त्व द्यायचे हे तुझे तूच ठरव कारण मुळातच ज्याला अस्तित्व नाही त्यात खरेपणा कुठून येणार आणि त्यात गुणदोष कसे असणार?