ग्रामीण विकासमंत्री गोविंद गावडे याचे उद्गार
सांगे : प्रत्येकाला आपले स्वत:चे घर असावे असे वाटते तसेच प्रत्येक नागरिकाला गाव म्हणून विचार करताना ग्रामपंचायतीचे स्वत:चे सुसज्ज असे पंचायघर असावे असे वाटत असते. मी ग्रामीण विकासमंत्री जरी असलो, तरी माझ्या मतदारसंघात अजून असा प्रकल्प सुरू झालेला नाही. परंतु सांगे मतदारसंघात ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत पंचायतघर विस्तार आणि नूतनीकरण प्रकल्प सुरू करू शकलो याचा आनंद वाटतो. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सोयी-सुविधा पोहोचल्या पाहिजेत. तो घटक वंचित राहता कामा नये. यासाठी काम केले पाहिजे, असे विचार ग्रामीण विकास, क्रीडा तसेच कला आणि सांस्कृतिकमंत्री गोविंद गावडे यांनी रिवण-सांगे येथे बोलताना व्यक्त केले. रिवण ग्रामपंचायतीच्या कार्यालय इमारतीचे नूतनीकरण आणि विस्तारकामाचे भूमिपूजन मंगळवारी दुपारी मंत्री गावडे यांच्या हस्ते आणि स्थानिक आमदार असलेले समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्या उपस्थितीत पार पाडले. यावेळी रिवण जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, रिवण सरपंच वैशाली नाईक, उपसरपंच सूर्या नाईक, दक्षिण गोवा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रवीण बरड, दक्षिण गोवा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यकारी अभियंता नितीन नेवरेकर, कंत्राटदार चेतन दलाल, चिन्मय, उपजिल्हाधिकारी मिलिंद्र वेळीप, गटविकास अधिकारी, अन्य पंचायत सदस्य आणि श्री विमलेश्वर देवस्थान समिती पदाधिकारी इत्यादी हजर होते. रिवण गावाकडे आपले जवळचे संबंध असून मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या धडाडीमुळे तीन महिन्यांत हा प्रकल्प मार्गी लागला. पक्षविरहीत, समाजातील लोकांची नस ओळखून काम करण्याची फळदेसाई यांची पद्धत वाखाणण्याजोगी आहे. या प्रकल्पाचा प्रस्ताव मार्गी लावण्याकामी जी तत्परता आणि क्रियाशीलता अधिकाऱ्यांनी दाखविली ती लोककल्याणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे, असे मंत्री गावडे यांनी सांगितले. पुढे पंचायतघर सुसज्ज व सुस्थितीत ठेवणे ही गावच्या लोकांची जबाबदारी आहे. दूरदृष्टिकोनातून पावले टाका, आवश्यक असेल तेथे बदल घडवून आणा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी सरपंच वैशाली नाईक, उपसरपंच सूर्या नाईक आणि उर्वरित पंचायत मंडळाचे कौतुक केले.
रिवण येथे साकारू शकते आयआयटी
समाजकल्याणमंत्री फळदेसाई यांनी रिवण गावात आयआयटी प्रकल्प येऊ शकतो असे सांगताना रिवण येथे आयआयटी स्थापन करण्याचा जो प्रस्ताव दिलेला आहे तो पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचे सांगितले. त्यामुळे या भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. रिवण येथे ग्रामीण दवाखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न चालू आहे. हा दवाखाना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या धर्तीवर असेल. ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत पंचायत इमारतीचा विस्तार आणि नूतनीकरण होत आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मंत्री गोविंद गावडे यांचे मोलाचे सहकार्य मिळालेले आहे, असे फळदेसाई यांनी सांगितले. रिवण येथील श्री विमलेश्वर मंदिर आणि बाजार परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर यांनी मंत्री गोविंद गावडे यांच्याकडे एखादा प्रस्ताव घेऊन गेला की सहकार्य लाभते असे सांगून पंचायत घर मार्गी लागण्यासाठी मंत्री गावडे आणि मंत्री फळदेसाई यांनी पंचायतीला खूप साहाय्य केले. पंचायतीचे स्वत:चे घर व्हावे ही सर्वांचीच इच्छा आहे. रिवण गावात जो आयआयटी प्रकल्प येऊ पाहत आहे त्याचे सर्वांनी स्वागत करून विकासाची दालने खोलूया असे सांगितले. उपसरपंच सूर्या यांनी पंचायत घराचे विस्तारिकरण आणि नूतनीकरण आपल्या कारकिर्दीत होत आहे याहून दुसरा आनंद नाही हे सांगितले. सरपंच वैशाली नाईक यांनी केव्हा पंचायत इमारतीचे बांधकाम होणार अशी विचारणा ग्रामस्थ करायचे. पण आज सुभाष फळदेसाई हे आमदार आणि मंत्री असल्यामुळे शक्य झाले असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन नाईक यांनी केले. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 82 लाख ऊपयांच्या घरात आहे. प्रारंभी उत्कर्ष हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गायिलेल्या स्वागत गीताने आणि पाहुण्यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमांची सुऊवात झाली.