पाच हजारांहून अधिक शेतकऱयांचा सहभाग
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
एमएसपी हमीसह विविध मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने सोमवारी दिल्लीच्या जंतरमंतरवर महापंचायत घेण्यात आली. दुपारपर्यंत 5 हजारांहून अधिक शेतकरी जंतरमंतरवर जमले होते. शेतकऱयांना रोखण्यासाठी सिंघू, टिकरी, गाझीपूर सीमेवर पोलिसांची तपासणी सुरू होती. मात्र, शेतकऱयांनी विविध मार्गांनी शहरात प्रवेश केल्यामुळे अनेक आंदोलक जंतरमंतरवर दाखल झाले होते. पोलिसांनी कसून चौकशी सुरू केल्यामुळे नोएडा-चिल्ला सीमेवर 5 किलोमीटर लांबपर्यंत वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
किसान मोर्चाने सोमवारपासून दिल्लीतील प्रसिद्ध जंतरमंतरवर आंदोलन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी दाखल होऊ लागले होते. यादरम्यान शेतकऱयांना दिल्लीच्या सीमेवर अडवले जात होते. मात्र, शेतकऱयांनी बॅरिकेडिंग तोडत शहरात प्रवेश केला. यानंतर 19 शेतकऱयांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या अडवणुकीमुळे गाझीपूर सीमेवर शेतकरी धरणे आंदोलनाला बसले होते. पोलीस शेतकऱयांशी चर्चा करत होते.
शेतकऱयांना रोखण्यासाठी कलम 144 लागू
सोमवारी सकाळपासूनच हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेशातील शेतकरी महापंचायतीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत पोहोचू लागले होते. मात्र, या महापंचायतीला शेतकऱयांना मंजुरी मिळाली नाही. या आंदोलनाला सरकारने परवानगी दिली नव्हती. तसेच राजधानीत कलम 144 लागू करण्यात आले होते. दिल्ली पोलिसांनी टिकरी, सिंघू आणि गाझीपूर सीमेवर सिमेंटचे बॅरिकेड्स लावले होते. या सीमांवर तपासणी केल्यानंतरच वाहनांना दिल्लीत प्रवेश दिला जात होता.
बहुतांश शेतकरी पंजाबकडून दिल्लीला जाण्यासाठी येणाऱया गाडय़ांमध्ये चढले आणि बहादूरगड स्टेशनवर उभ्या असलेल्या पोलिसांसमोर घोषणाबाजी करत दिल्लीला आले. येथून शेतकऱयांनी थेट बांगला साहिब गुरुद्वारा गाठले. आपण जंतरमंतरवर ठाण मांडण्यासाठी जात नसून केवळ एक दिवस आंदोलन करण्यासाठी जात असल्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर काही शेतकऱयांना दिल्लीमध्ये सोडण्यात आले.
ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्हीद्वारे नजर
शेतकऱयांच्या महापंचायत दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस सतर्क झाले होते. गर्दी होत असलेल्या ठिकाणी ड्रोन कॅमेऱयांचीही मदत घेतली जात असून सीमेवर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱयांच्या फुटेजवरही लक्ष ठेवले जात आहे. गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यास वरिष्ठ अधिकाऱयांच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल, असे दिल्ली पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.
विविध मागण्यांसाठी शेतकरी आग्रही
गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांची हकालपट्टी, तुरुंगात असलेल्या निरपराध शेतकऱयांची सुटका, एमएसपी हमी कायदा, वीज दुरुस्ती विधेयक 2022 मागे घेण्यात यावे, उसाचे बिल वेळेत अदा करणे यासह विविध मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चा आग्रही आहे. केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा टेनी यांना हटविण्याबरोबरच शेतकरी मालाला किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हमी देण्यासाठी कायदा लागू करणे या दोन मुख्य मागण्या शेतकरी संघटनांनी केल्या आहेत. तसेच अन्य मागण्याही सरकारला कळविण्यात आल्याचे संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी सांगितले.