कृषी दिनानिमित्त बेळगाव तालुक्यातील 5 शेतकऱ्यांचा सन्मान
प्रतिनिधी /बेळगाव
कृषी खात्यामार्फत दरवर्षी कृषी दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान केला जातो. यंदाही कृषी दिनादिवशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. सेंद्रिय खताचा वापर करून शेती फुलवणाऱ्या बेळगाव तालुक्यातील पाच शेतकऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
अलीकडे सेंद्रिय शेतीचे महत्त्व समजू लागल्याने सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. तालुक्यातील भुजंग घळगू कोरजकर (सावगाव), मनोहर पाटील (कंग्राळी), नागेश मायाप्पा ग•s (कणबर्गी), यल्लाप्पा लक्ष्मण आनंदाचे (होनगा), पिराजी गणपती माहूत आदी शेतकऱ्यांचा कृषी खात्यातर्फे गौरव करण्यात आला. पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताचा वापर करून शेतीतून उच्चांकी उत्पादन घेतले आहे. याची दखल घेत कृषी दिनाचे औचित्य साधून त्यांचा गौरव करण्यात आला. कृषी खात्याचे सहसंचालक शिवनगौडा पाटील, आर. डी. कटगल, राजशेखर भट, आर. बी. नायकर यासह शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीकडे कल
तालुक्यातील पाच प्रगतशील शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करून शेतीत भरघोस उत्पादन घेतले आहे. शिवाय सेंद्रिय शेतीकडे कल वाढला आहे. अशा प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आल्याचे तालुका कृषी अधिकारी आर. बी. नायकर यांनी सांगितले.