वृत्तसंस्था/ कराची
पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष नजम सेठी यांनी आयसीसी प्रमुख ग्रेग बार्कले यांना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी भारताविऊद्ध विश्वचषक स्पर्धेतील सामना खेळण्याबद्दल त्यांना ज्या चिंता वाटतात त्याबद्दल माहिती दिल्याचे समोर आले आहे. पीसीबीची इच्छा त्यांचे सामने कोलकाता, चेन्नई आणि बेंगळुरू येथे खेळवावेत अशी आहे.
बार्कले आणि आयसीसीचे महाव्यवस्थापक ज्योफ अॅलार्डिस यांनी अलीकडेच पीसीबी प्रमुखांकडून आश्वासन मिळविण्यासाठी कराचीला भेट दिली होती. आशियाई क्रिकेट मंडळाने आशिया चषक स्पर्धा ‘हायब्रीड मॉडेल’चा वापर करून खेळविण्याची मागणी नाकारली, तर पाकिस्तान विश्व़चषक स्पर्धेतील त्यांचे एकदिवसीय सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्याची मागणी करणार नाही, असे आश्वासन मिळविण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता.
पीसीबीच्या एका वरिष्ठ सूत्रानुसार, सेठी यांनी बार्कले आणि अॅलार्डिस यांना कळवले आहे की, पाकिस्तानला अंतिम सामन्यासारखा बाद फेरीतील सामना असल्याखेरीज अहमदाबादमध्ये सामने खेळायचे नाहीत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतात जाण्याची परवानगी पाक संघाला पाकिस्तान सरकारकडून मिळाल्यास चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता येथे त्यांचे सामने ठेवावेत अशी विनंती सेठी यांनी आयसीसीला केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पाकिस्तान क्रिकेट मंडळ अहमदाबादमध्ये भारताशी खेळावे लागल्यास आपल्या खेळाडूंच्या सुरक्षेचे कसे होणार यावरून चिंतीत असले, तरी इंझमाम उल हकच्या नेतृत्वाखालील पाक संघाने 2005 मध्ये भारत दौरा केला असता मोटेरा येथे ते खेळले होते. पीसीबीच्या अधिकाऱ्याने असेही सांगितले की, सेठी यांनी आयसीसीच्या अधिकाऱ्यांना आशिया कपसाठी पाकिस्तानचा हायब्रिड मॉडेल स्वीकारण्यास बीसीसीआयला राजी करण्यास सांगितले आहे, पण ते घडण्याची शक्यता नाही. सेठी यांनी जोपर्यंत पाकिस्तान मंडळाचा हिस्सा वाढविला जात नाही तोवर नवीन महसूल वाटणी मॉडेल स्वीकारणार नाही, असाही पवित्रा घेतला आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या तुलनेत पाकिस्तानला आयसीसीच्या कमाईतील कमी वाटा मिळावा हे अयोग्य असल्याचे सेठी यांनी निदर्शनास आणून दिले आहे, असे सदर सूत्रांनी सांगितले.