प्रतिनिधी / बेळगाव
राज्यातील सर्व महिलांसाठी 1 जूनपासून पूर्णपणे मोफत बस प्रवास दिला जाणार, अशी माहिती परिवहन मंत्रीनी दिली होती. त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला होता. मात्र अद्याप अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे बसस्थानकात आलेल्या महिलांना तिकीट काढूनच प्रवास करावा लागला.
काँग्रेस सरकारने जाहिरनाम्यात पाच गॅरंटी योजनांची घोषणा केली आहे. महिलांना मोफत प्रवास, 200 युनिट मोफत वीज, कुटुंब प्रमुख महिलांना मासिक दोन हजार रुपये दिले जाणार आहेत, अशी आश्वासने देण्यात आली आहेत. दरम्यान परिवहन मंत्र्यांनी गुरुवारपासून महिलांना मोफत प्रवास दिला जाणार आहे, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे बसस्थानकात आलेल्या महिलांमध्ये मोफत बस प्रवास करण्यासाठी उत्साह निर्माण झाला होता. मात्र गुरुवारी मोफत प्रवासाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे महिलांना तिकीट काढूनच प्रवास करावा लागला. राज्य काँग्रेस सरकारच्या पाच हमी योजनांची घोषणा करण्यासाठी शुक्रवारी बैठक बोलाविण्यात आली आहे. त्यानंतरच या योजनांच्या अंमलबजावणीबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.