उत्तर प्रदेश सरकारने नुकतेच कारागृह नियमावलीमध्ये महत्त्वाचे बदल करून महिला कैद्यांना दिलासा दिला आहे. नव्या नियमांच्या अनुसार आता विवाहित महिला कैद्यांना कारागृहातही मंगळसूत्र घालण्याची अनुमती मिळणार आहे. तसेच कारागृहात त्यांना संतती झाल्यास कारागृहातच त्यांच्या संततीचे बारसेही साजरे केले जाणार आहे. तसेच महिला कैद्यांना कारागृहात त्यांच्या पसंतीचे कपडे वापरण्याची मुभा मिळणार आहे. या सवलती देताना महिला कैद्याच्या धर्माचाही विचार करण्यात आलेला आहे. यापुढे उत्तर प्रदेशातील कारागृहांमध्ये शेवया, खीर इत्यादी प्रसादाचे पदार्थही बनविले जाणार आहेत. हिंदू महिला कैद्यांसाठी खीर तर मुस्लीम महिला कैद्यांसाठी खजुराची व्यवस्था केली जाणार आहे.
कारागृहात आईसह राहणाऱया अपत्यांसाठी मनोरंजनाची साधने उपलब्ध होणार आहेत. कारागृहांमध्ये चिल्ड्रन्स पार्क बनविले जातील. महिला कैद्यांच्या मुलांना शाम्पू आणि खोबरेल तेल देण्यात येईल. अन्न शिजवण्यासाठी मोहरीच्या तेलाऐवजी रिफाईंड तेल दिले जाईल. कारागृहातच लाँड्री आणि बेकरीचीही व्यवस्था होईल. पुरुष कैद्यांना दाढी करण्यासाठी युज अँड थ्रो रेझर दिला जाईल. तसेच टूथब्रश, टूथपावडर पुरवला जाईल. लॉकअप जेलची व्यवस्था समाप्त केली जाणार आहे.
महिला कैद्यांसंबंधी कारागृहातील वातावरणाबद्दल बरीच टीका अनेक दशकांपासून होत आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने एका आयोगाची स्थापना करून सुधारणा सूचनांना मान्यता दिली आहे. त्यानुसार या सुधारणा करण्यात येत आहेत. विशेषतः महिला कैद्यांची मानसिकता आणि त्यांच्या अपत्यांवर असणारे इतर कुठल्याही महिलेप्रमाणेच प्रेम लक्षात घेऊन अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या निर्णयाचे सामाजिक कार्यकर्त्यांकडून कौतुक होत आहे.