गाय -म्हैशीस ३० हजार, बैलास २५ तर वासरास १६ हजारांचा निधी; जिल्हा समितीमार्फत होणार अंमलबजावणी
विजय पाटील / सरवडे
लम्पी या विषाणू व संसर्गजन्य आजाराचा फैलाव राज्यात जोरात होत आहे. या रोगाने पाळीव जनावरांचा मृत्यू होत असून पशुपालकांचे मोठे नुकसान होत आहे. या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी शासन उपाय योजना करीत असून ज्या पशुपालकांचे जनावर मृत्यूमुखी पडले आहे त्यांना शासन राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी धोरणानुसार अर्थसहाय्य करणार आहे. जिल्हास्तरीय समिती मार्फत हा निधी दिला जाणार असून मृत झालेल्या दुधाळ गाय व म्हैशीस ३० हजार, ओढकाम करणारी जनावरे (बैल) २५ हजार तर वासरांना १६ हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. यामध्ये प्रतिकुटूंब जनावर संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे.
जनावरांच्यामध्ये फैलावलेला लम्पी हा चर्मरोग असून महाराष्ट्रात प्रथमतः जळगाव जिल्ह्यात या रोगाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर राज्यातील २१ जिल्ह्यामध्ये या रोगाचा प्रसार झपाट्याने वाढू लागला. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाने बैठक घेतली. त्यामध्ये शेतकरी अथवा पशुपालक यांचे जनावर या रोगाने दगावल्यास त्यांना अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
लम्पी आजाराने पशुधन मृत झाल्यास पशुपालकांने तात्काळ त्याची सुचना पशुवैद्यकीय दवाखाना किंवा ग्रामपंचायतीत द्यावयाची आहे. त्यानंतर पशुधन विभाग अधिकारी, ग्रामसेवक अथवा तलाठी, पोलिस पाटील व दोन स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीत मृत जनावराचा पंचनामा केला जाईल. पंचनाम्यात जनावराचा मृत्यू लम्पी आजाराने झाला असल्याचे बंधनकारक आहे. त्यानंतर पंचनामा तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय संबंधित यंत्रणेकडून जिल्हा समितीकडे पाठविला जाईल. जिल्हा समितीकडून पंचनाम्याची खातरजमा झाल्यानंतर अर्थसहाय्य मिळण्याची शिफारस आठवड्याच्या आत केली जाणार असून जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या मंजुरीने १५ दिवसांत रकक्म पशुपालकाच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
याप्रमाणे मिळणार अर्थसहाय्य
जनावर प्रकार रक्कम प्रतिकुटूंब मर्यादा
दुधाळ गाय/ म्हैस ३० हजार रु. ३ मोठी जनावरे
बैल २५ हजार रु. ३ मोठी जनावरे
वासरे १६ हजार रु. ६ जनावरे