यूयूसीएमएस अॅपमध्ये परीक्षा फी भरताना तांत्रिक अडचणी
बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठ (आरसीयू)मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी येत असल्याने आर्थिक फटका बसत आहे. परीक्षा फी भरण्यासाठी यूयूसीएमएस अॅपमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने एकाच विद्यार्थ्याला दोनवेळा परीक्षा फी भरावी लागत आहे. तांत्रिक अडचणी येत असल्या तरी आरसीयूने मात्र विद्यार्थ्यांच्या नुकसानाबाबत हात वर केल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.
आरसीयूअंतर्गत बेळगाव, विजापूर व बागलकोट या जिल्ह्यांमधील महाविद्यालयांचा समावेश होतो. 400 कॉलेजमधील 1 लाखांहून अधिक विद्यार्थी विद्यापीठांतर्गत येतात. विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासोबतच परीक्षा फी भरणे, इतर शैक्षणिक माहिती यूयूसीएमएस अॅपमध्ये उपलब्ध आहे. विद्यार्थी या अॅपच्या साहाय्याने परीक्षा फी भरत आहेत. अॅपमधील तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा फी भरली तरी त्यांची माहिती 2 ते 3 दिवसांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहे. तसेच एकदा फी भरली असतानाही बरेच विद्यार्थी तांत्रिक अडचणीमुळे पुन्हा फी भरत आहेत. परत त्यांचे पैसे कापले जात असल्याने यामुळे आर्थिक फटका बसत आहे. तसेच वेळेत फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांकडून दंड वसूल केला जात आहे. मंगळवारी काही विद्यार्थ्यांनी भुतरामहट्टी येथील आरसीयू
कॅम्पसमध्ये भेट देऊन परीक्षा विभागाशी चर्चा केली. पहिल्या, तिसऱ्या, पाचव्या सेमीस्टरच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी येत आहेत. बीए, बीबीए, बीएस्सी, बीकॉम, बीएसडब्ल्यू अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी 31 जानेवारीपर्यंत परीक्षा फी भरावयाची अंतिम तारीख होती. 1 फेब्रुवारीनंतर परीक्षा फी भरणाऱ्या प्रत्येक दिवसाला 100 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी यूयूसीएमएसद्वारे परीक्षा फी भरूनही तांत्रिक कारणामुळे अडथळा आला आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना नाहक दंड भरावा लागणार आहे. काही विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्येही चौकशी केली असता कॉलेज प्रशासन हतबल आहे. त्यामुळे आरसीयू प्रशासनाने यासंदर्भात योग्य निर्णय घ्यावा व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.