अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत उद्धवाला त्यांच्या ब्रह्मस्वरूपाचा परिचय करून देत आहेत. ते म्हणतात, ब्रह्मस्वरूप ही एकच गोष्ट खरी असून समोर दिसणाऱ्या सर्व गोष्टी मिथ्या आहेत म्हणजे त्या समोर दिसत असल्या तरी निरर्थक आहेत. लहानपणीची खेळणी मोठेपणी पुढ्यात आली तर मनुष्य ती निरर्थक म्हणून मागे सारतो पण जीवनात मात्र समोर दिसणारी दुनिया खरी आहे असे मानतो, अगदी त्याच्या देहासकट! खरं बघितलं तर देह हा निर्जीव असतो परंतु मन आत्म्याकडून ऊर्जा घेऊन त्याला जिवंतपणा आणते. त्यामुळे मिथ्या प्रपंच खरा वाटू लागतो. मी कर्ता आहे असा अभिमान वाटू लागतो. हे सर्व ईश्वराचे ज्ञान नसल्याने घडते. जोपर्यंत हे ज्ञान मिळत नाही तोपर्यंत अज्ञानरूपी दीर्घ स्वप्नात मनुष्य प्रपंचाचा विस्तार करत बसतो. त्यातच जन्म, मरण इत्यादि कल्पना लढवतो. वास्तविक पाहता जन्म आणि मरण हे दोन्ही मिथ्या आहेत कारण देहातील आत्मा अमर आहे हेच खरे ज्ञान आहे. प्रत्येकजण स्वत: परिपूर्ण ब्रह्म आहे आणि हेच त्याचे निजस्वरूप आहे. त्यात कोणताही भेदभाव नाही, शुभाशुभ असेही काही नाही. आत्म्याला जन्मही नाही तसेच मरणही नाही. हेच निखळ सत्य आहे पण मनुष्य तेच लक्षात घेत नाही. संसार हा मृगजळाप्रमाणे आहे. मृगजळात पाणी आहे असे दिसत असते पण प्रत्यक्षात तिथे पाण्याचा टिपूसही नसतो म्हणून ते मिथ्या ठरते. त्याप्रमाणे अस्तित्वात नसलेल्या प्रपंचातील माणसांच्या गुणदोषांची चर्चा निरर्थक आहे. प्रपंच निखालस खोटा असल्याने कानांनी ऐकलेल्या मिथ्या गोष्टींवर किंवा डोळ्यांनी पाहिलेल्या मिथ्या घटनांवर कितपत महत्व द्यायचे हे तुझे तूच ठरव कारण मुळातच ज्याला अस्तित्व नाही त्यात खरेपणा कुठून येणार? मग मी ह्या हातानी गोष्टी दिल्या, घेतल्या, पायांनी चाललो, वाचेने बोललो हे सर्व मिथ्याच ठरते. स्वत:च्या अहंकाराचा टेंभा मिरवणे, चित्ताने चिंतन करणे, बुद्धीने विवेकाचे विचार मांडणे हे सगळं सगळं उद्धवा मिथ्या आहे रे बाबा! समजा भिंतीवर एक सुंदर निसर्गचित्र काढले ते कितीही सुंदर असले तरी चित्रातल्या पाण्याला, अग्नीला किंवा स्त्राr पुरुषांना कधी खरेपण असते का? ते चित्र पुसले की उरते ती केवळ एक भिंत असते. माणसाला हा प्रपंच अद्वैत भासत असतो त्यामुळे त्यात तो समरसून जातो प्रत्यक्षात प्रपंच हा द्वैत आहे. त्यातील घटना, व्यक्ती आणि परिस्थिती आणि हे सर्व पाहणारा, अनुभवणारा मनुष्य वेगवेगळे आहेत पण प्रपंच अद्वैत भासल्याने माणसाला तो आणि प्रपंच एकच आहेत असे वाटते. केळीचा गाभा सोलत गेलं तर हाती काय लागतं? काहीच नाही कारण तो पोकळच असतो. त्याप्रमाणे प्रपंच कितीही केला तरी हाती काहीच लागत नाही. त्याला ना शेंडा ना बुडखा! परंतु त्यातही लोक स्वत:ची कल्पना लढवत बसतात. पाण्यात प्रतिबिंब दिसतं पण ते खरं असत नाही. त्याप्रमाणे प्रपंच खरं नसून माणसाला तो खरं वाटतो. त्या प्रतिबिंबात पाहून मनुष्य टिळा लावतो त्याप्रमाणे तो देहाभिमानाचा टिळा स्वत:ला लाऊन घेतो. आपल्या मुखातून निघालेल्या आवाजाचा प्रतिध्वनी आपल्याला ऐकू येतो. वास्तविक पाहता दोन्ही मिथ्याच आहेत परंतु हे सगळे खरे आहे ह्या भ्रमात मनुष्य असतो. ज्याप्रमाणे अंधारातील निर्जीव दोराला मनुष्य साप समजून थरथर कापू लागतो. त्याप्रमाणे देहाभिमानामुळे स्वत:च़ा देह आणि समोर दिसणारी दुनिया खरी समजून ती होताहोइतो आपल्याला अनुकूल कशी होईल ह्यासाठी त्याचा महाभयंकर खटाटोप चालू असतो. हा देहाभिमानच माणसाला अनेक जन्ममरण भोगायला लाऊन कल्पनेच्या पलीकडील दु:खे सोसायला लावतो. आत्म्यातूनच देहादेहात भेदभाव उपजला असे वेद सांगतो पण त्यापुढील आत्मा त्रिगुणांनी वेढलेला असल्याने देहाच्या अहंकारामुळे भेदाभेद करतो हे कुणी बोलत नाहीत. उद्धवाच्या मनात ही शंका आली होतीच ती जाणून भगवंतानी स्वत:च त्याचे उत्तर दिले.