शेती, बागायतीचे नुकसान, पंप हाऊस बांधकामही पाण्यात
प्रतिनिधी /पेडणे
बैलपार कासारवर्णे येथील नदीला पुराचे पाणी येऊन पाणी शेतात आणि बागायतीत गेल्याने मोठय़ा प्रमाणात शेती बागायतीचे नुकसान झाले आहे. या नदीवर पुलाजवळ बसवण्यात येणाऱया पाण्याचा पंप हाऊसच अर्धा भाग पाण्याखाली गेला आहे.
महाराष्ट्राच्या डोंगराळ भागात दोन दिवास पडलेल्या मुसळधार पावसामुळे मोठय़ा प्रमाणात बैलपार नदीला पाणी आल्याने पूर आला आहे. या पाण्यात चांदेल तसेच कासारवर्णे शेती बागायतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
सरकार उदासीन : जितेंद्र गावकर
बैलपार येथे नदीला बंधारा असून त्यामध्ये पावसाचे पाणी अडवून राहते तसेच कचरा, सुकी झाडे येवून साठवून राहत आसल्याने पाणी जाण्यासाठी मार्ग मिळत नाही. त्यामुळे हे पाणी परिसरात पसरते. दरवषी या भागात पावसाच्या पाण्यामुळे नुकसान होते. मात्र सरकार याबाबत कोणतीच ठोस पाऊले उचलत नसल्याचे काँग्रेसचे नेते ऍड. जितेंद्र गावकर म्हणाले.
नुकसान भरपाई द्यावी : उदय महाले
आम्ही गेले दीड वर्ष या भागातील समस्या बाबत सरकारकडे मागणी करूनही समस्या सोडवण्यास सरकार अपयशी ठरले आहे. आता परत एकदा या भागात पाणी भरल्याने या समस्येमुळे लोकांची शेती बागायतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झालेले आहे. या शेती बागायतीचे झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधित खात्याने शेतकऱयांना द्यावी, अशी मागणी उदय महाले यांनी केली आहे.