वृत्तसंस्था/ पोर्ट्समाउथ
भारतीय क्रिकेट संघ 7 जूनपासून ओव्हलवर सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी सज्ज होत असताना ‘आयपीएल’मध्ये भरपूर खेळलेल्या गोलंदाजांवरील भार वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. गोलंदाजांपैकी मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनादकट आणि उमेश यादव हे इंग्लंडला रवाना झालेल्या पहिल्या तुकडीचा भाग राहिले. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला जाण्यास मात्र विलंब झाला. कारण अहमदाबादमधील आयपीएलची अंतिम फेरी संततधार पावसामुळे रविवारच्या ऐवजी सोमवारी राखीव दिवशी खेळवावी लागली.
राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील कोचिंग स्टाफसह पहिल्या तुकडीमध्ये रवाना झालेल्या खेळाडूंमध्ये मधल्या फळीचा मुख्य आधार विराट कोहलीचा देखील समावेश होता. कोहली सोमवारी चेतेश्वर पुजारासह सराव शिबिरात सामील झाला. पुजारा इंग्लंडमध्ये संघाला येऊन मिळाला. कारण तो ससेक्सतर्फे काउंटी क्रिकेट खेळण्यात व्यस्त होता. अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघ ससेक्समधील अरुडेल कॅसल क्रिकेट क्लबमध्ये काही सराव सत्रांत सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
आतापर्यंतची तयारी चांगली झाली आहे. सुरुवातीचा थोडा वेळ सराव सत्रात रुळण्यासाठी गेला. परंतु शेवटची दोन सत्रे खूपच चांगली झाली आहेत. मला वाटते की आम्ही गोलंदाजांना कसोटी सामन्यासाठी तयार करण्याच्या दृष्टीने त्यांच्यावर थोडासा अधिक भार टाकला, असे भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रेने बीसीसीआयने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. आम्ही एकंदर परिस्थितीवर खूष आहोत. हे एक सुंदर मैदान असून हवामान स्थिर आहे. त्याशिवाय ऊन, थोडासा वारा आणि थोडीशी थंडी आहे. पण इंग्लंडमध्ये खेळताना त्याची आपल्याला सवय करून घ्यावी लागते, असे त्याने म्हटले आहे.
भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनी, ‘आयपीएल’मध्ये खेळाडूंची भरपूर धावाधावा झालेली असल्याने जवळचे झेल पकडण्याचा सराव करण्यावर लक्ष केंद्रीत केले जाईल, असे सांगितले आहे. खेळाडू आयपीएलमधून आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील भार, ते किती धावलेले आहेत, त्यांनी किती काळजी घेतलेली आहे याचा विचार करणे महत्त्वाचे बनलेले आहे.आयपीएलमध्ये मैदानी क्षेत्ररक्षणाचा बऱ्यापैकी सराव झालला आहे. त्यामुळे येथे अधिक लक्ष फलंदाजांचे जवळचे झेल पकडणे, स्लिपमध्ये झेल पकडणे आणि फ्लॅट कॅच यावर देण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
अंतिम सामन्यापूर्वी गोलंदाजांना थोडी विश्रांती मिळेल. मात्र संघाने प्रशिक्षण सत्रांचा जास्तीत जास्त फायदा उठवण्याचा निर्धार केलेला आहे, असे म्हांब्रे यांनी सांगितले. कसोटी सामन्याच्या स्वरूपाशी खेळाडूंनी जुळवून घेण्यावर लक्ष केंद्रीत केले जाईल, असे भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी सांगितले आहे. ‘ते सर्व जण भरपूर क्रिकेट खेळले आहेत. आम्हाला जो काही वेळ मिळेल तो वेगळ्या स्वरूपाशी जुळवून घेण्यावर आणि लाल चेंडूने खेळण्याची सवय लावण्यावर खर्च केला जाईल’, असे त्यांनी स्पष्ट केला आहे.