बेळगावातूनच झाला होता भूमिगत : खून, खंडणी प्रकरणांचा मास्टरमाईंड : 19 मार्च 2009 मध्ये अटक : 2014 मध्ये मिळाला जामीन
प्रतिनिधी /बेळगाव
एकीकडे गोवा आणि दुसरीकडे महाराष्ट्र या दोन्ही सीमांच्यामध्ये वसलेल्या बेळगावात अनेक गुन्हेगारांनी यापूर्वी आश्रय घेतला होता. तस्करी व गुन्हेगारी कारवायांसाठी बेळगाव नंदनवन बनले आहे. वारंवार उघडकीस येणाऱया घटनांमुळे हे अधोरेखित झाले आहे. एखाद्या शहरातील पोलीस यंत्रणा निष्क्रिय ठरली तर गुन्हेगार कसे वरचढ ठरतात, हे बेळगावकरांनी अनेकवेळा अनुभवले आहे.
छोटा शकीलचा हस्तक रशिद मलबारी गेल्या अनेक वर्षांपासून फरारी आहे. बेळगाव, हुबळी-धारवाड, कारवार परिसरात खंडणीसाठी अपहरण, खून आदी गुन्हे करणारा रशिद सध्या कोठे आहे? याचा थांगपत्ता पोलीस यंत्रणेला नाही. बेळगाव येथे दाखल झालेल्या अनेक गुन्हेगारी प्रकरणात तो पोलिसांना हवा आहे. मात्र, त्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत.
रोहन रेडेकर खून प्रकरणात हात
गेल्या सात वर्षांपूर्वी रशिदने बेळगाव परिसरात अपहरण केले आहे. खून प्रकरणातही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. रोहन रेडेकर (वय 23) या तरुणाचे खंडणीसाठी अपहरण करून त्याचा खून करण्यातही रशिद मलबारीचा हात असल्याचे यापूर्वीच उघडकीस आले आहे. या प्रकरणातील इतर संशयितांना अटक झाली असली तरी रशिद अद्याप फरारी आहे.
कृष्ण भट्ट पोलीस आयुक्त असताना रशिदच्या साथीदारांना अटक झाली होती. 19 मार्च 2009 रोजी मंगळूर पोलिसांनी रशिद मलबारीला अटक केली होती. श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक व वरुण गांधी यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धतेत ठेवण्यात आले होते.
याचवेळी छोटा राजनचा हस्तक युसुफ बच्चेखान हाही हिंडलगा कारागृहात स्थानबद्धतेत होता. रशिद व युसुफ यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाल्यामुळे या दोघा जणांना हिंडलगा कारागृहातून वेगवेगळय़ा कारागृहात हलविण्यात आले होते. 21 जुलै 2014 रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर बेंगळूर येथील परप्पन अग्रहार कारागृहातून बाहेर पडलेला रशिद गेला कुठे? याची पुसटशी माहितीही पोलीस यंत्रणेला नव्हती.
बेंगळूरमधून गायब झालेला रशिद दुबईला गेला असणार, असा संशय होता. मात्र, त्याने थेट बेळगाव गाठले होते. एक-दोन वर्षे बेळगाव येथे आश्रय घेऊन खंडणीसाठी उद्योजक, बिल्डरांचे त्याने अपहरणही केले होते. ही प्रकरणे उशिरा उघडकीस आली. तोपर्यंत रशिद बेळगावातूनही गायब झाला होता. येथील एपीएमसी व माळमारुती पोलीस स्थानकात त्याच्यावर अपहरण व खुनाचे गुन्हे नोंद आहेत.
अरब राष्ट्र गाठल्याची माहिती उपलब्ध
मध्यंतरी रशिदला अबुधाबीत अटक झाल्याची माहिती मिळाली. बांगलादेशच्या नागरिकत्वाची कागदपत्रे तयार करून तो अबुधाबीत शिरला होता. त्यावेळी मंगळूर व बेळगाव पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले. मुंबई पोलीसही याच प्रयत्नात होते. बेळगाव येथून फरारी झालेला रशिद पश्चिम बंगालमार्गे बांगलादेशला पोहोचला होता. बनावट पासपोर्ट तयार करून त्याने अरब राष्ट्र गाठल्याची माहिती उपलब्ध झाली होती.
14 मे 2017 रोजी मलबारीच्या पाच साथीदारांना अटक
14 मे 2017 रोजी रशिद मलबारीच्या पाच साथीदारांना बेळगाव येथे अटक करण्यात आली होती. याच दरम्यान रशिदने बेळगाव येथून पलायन केले होते. पोलीस व गुप्तचर यंत्रणांनी त्याला ताब्यात घेण्यासाठी त्यावेळी प्रयत्न केले होते. रशिद बांगलादेशी नागरिक नाही तर तो भारतीय आहे, हे पटवून त्याला भारताच्या ताब्यात घेण्याची गरज होती. मात्र, यंत्रणेला यश आले नाही. याचाच फायदा घेत तो तेथूनही निसटला होता.
गेल्या पाच वर्षांपासून तो बेळगाव पोलिसांना हवा आहे. त्यानंतरच्या काळात त्याला अटक करण्यासाठी प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. छोटा शकीलसाठी काम करणाऱया रशिद मलबारीने बेळगाव परिसरात तरुणांची जमवाजमव करून एक टोळी उभारली होती. आपल्या टोळीत ‘मामू’ या नावाने ओळखल्या जाणाऱया रशिदला मधुमेहाचा त्रास आहे. याच कारणामुळे तो त्रस्त होता. बेळगावात राहून मुंबई येथील अनेक उद्योजकांना खंडणीसाठी त्याने धमकावले आहे. त्याला अटक केली तर अनेक प्रकरणांचा उलगडा होणार आहे. मात्र, त्यासाठी पोलीस दलात इच्छाशक्तीचा अभाव दिसून येतो आहे. केवळ रशिद मलबारीच नव्हे तर मुंबईचा नामचीन गुंड सुरेश मंचेकरनेही काही वर्षे बेळगाव येथे आश्रय घेतला होता. त्याने कावेरीनगर येथे अलिशान बंगलाही बांधला होता. 15 ऑगस्ट 2003 रोजी महाराष्ट्र पोलिसांनी बेळगावात धाड टाकून त्याला अटक केली. त्याला मुंबईला नेताना कोल्हापूरजवळ चकमकीत त्याचा खात्मा करण्यात आला. मुंबई, बेंगळूर, मंगळूर अंडरवर्ल्डमधील अनेक गुन्हेगारांनी बेळगावला आश्रयासाठी सुरक्षित मानले आहे. येथील निष्क्रिय पोलीस यंत्रणेमुळेच गुन्हेगारांच्या मनात सुरक्षिततेची भावना बळावली आहे. पोलीस दलाने जर शोध घेतला तर आणखी किती ‘डॉन’ आणि ‘दादा’ जाळय़ात अडकतील, याची कल्पना केलेलीच बरी.
बेळगाव पोलीस अंधारातच
ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकातील रविंद्रनाथ आंग्रे यांच्या टिमने सुरेश मंचेकरला बेळगावात ताब्यात घेतले. त्याच्या पत्नीने टिळकवाडी पोलीस स्थानकात धाव घेतली. कोणी तरी आपल्या पतीचे अपहरण केले आहे, अशी फिर्याद देण्यासाठी ती पोलीस स्थानकात पोहोचली होती. कोल्हापूरजवळ एन्काऊंटरमध्ये त्याचा खात्मा होईपर्यंत स्थानिक पोलिसांना याचा मागमूस नव्हता. या मुद्दय़ावरून त्यावेळी वरि÷ पोलीस अधिकाऱयांत चांगलाच संघर्ष रंगला होता. रात्रीच्या गस्तीवरील पोलिसांनी दुचाकीवरून जाणाऱया सुरेश मंचेकरला अडवून एकदा तपासणी केली होती. त्याच्या दुचाकीत पिस्तूल आढळले होते. त्याचवेळी त्याची चौकशी झाली असती तर कदाचित सुरेश मंचेकरला अटक करून बेळगाव पोलिसांनी आपला लौकिक वाढविला असता. मात्र, त्याऐवजी मंचेकरने त्यांना ‘लक्ष्मी’चा आशीर्वाद देऊन खिसा गरम करताच त्याला सोडून देण्यात आले.