ऑनलाईन टीम/तरुण भारत
पूजा चव्हाण (pooja chavan) आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड (sanjay rathod) यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. महाविकास आघाडी सरकारमध्ये (mahavikas aghadi) ते वनमंत्री होते. आता त्यांनी आपल्या मंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य केलंय. संजय राठोड यांनी माझ्यावरील आरोपांच्या प्रकरणाची चौकशी झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) मला पुन्हा मानसन्मानाने मंत्रिमंडळात घेतील, अशी आशा व्यक्त केलीय. तसेच मुख्यमंत्र्यांनी पुन्हा मंत्रिपदाची संधी दिली तर चांगलं काम करू, असंही संजय राठोड यांनी नमूद केलं. ते वाशिममध्ये एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
संजय राठोड म्हणाले, “जेव्हा माझ्यावर बिनबुडाचे आरोप झाले त्यावेळी मी स्वतःहून मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला होता. राजीनामा देताना आणि दिल्यानंतर मी आपल्या चॅनलसमोर येऊन हेच बोललो होतो की महाराष्ट्रात अतिशय घाणेरडं आणि खालच्या पातळीचं राजकारण सुरू आहे. ३० वर्ष सामाजिक, राजकीय जीवनात मी चारवेळा प्रचंड मतांनी निवडून आलोय. काही जणांनी माझं राजकीय करियर आणि माझं संपूर्ण जीवन उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला ही निंदनीय बाब आहे. मी राजीनामा देतो, चौकशी होऊ द्या. त्याप्रमाणे मी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिली.”
तसेच, “मी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला होता तेव्हा म्हटलं होतं की माझी चौकशी करा. मला परत मंत्रिपदाची (minister) जबाबदारी द्यायची की नाही त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला संधी दिलीच होती, मात्र घाणेरड्या राजकारणामुळे मला राजीनामा द्यावा लागला. मी स्वतःहून मुख्यमंत्र्यांना राजीनामा दिला. त्यांनी तो स्विकारला,” असं संजय राठोड यांनी सांगितलं.